पुणे प्रतिनिधी
सध्या टोमॅटो उत्पादक शेतकर्याना चांगले दिवस आले आहेत. कारण दिवसेंदिवस टोमॅटोची लाली वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरात मोठी वाढ झाली आहे. मुंबईत टोमॅटोचे दर 100 ते 120 रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत. तर दिल्ली-एनसीआर भागात टोमॅटोचे किरकोळ दर हे 90 रुपये किलोवर पोहोचले आहेत. जाणून घेऊयात कोणत्या बाजारात टोमॅटोला किती दर मिळत आहे.
टोमॅटोच्या वाढत्या दराचा फायदा शेतकऱ्यांना
टोमॅटोच्या वाढत्या दराचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. तर सर्वसामान्यांच्या खिशाला वाढत्या दरामुळं झळ लागच आहे. मान्सूनच्या पावसामुळे दिल्लीसह अनेक राज्यांतील टोमॅटोच्या पुरवठ्यावर विपरीत परिणाम झाला आहे. टोमॅटोचे भाव गगनाला भिडू लागले आहेत. आझादपूर मंडी, गाझीपूर मंडी आणि ओखला भाजी मार्केट यांसारख्या दिल्लीतील अनेक मोठ्या घाऊक भाजी मार्केटमध्ये टोमॅटोच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. जिथे काही दिवसांपूर्वी किरकोळ बाजारात टोमॅटो 28 रुपये किलोने विकला जात होता, तिथे आता टोमॅटो 90 रुपये किलो झाला आहे.
पावसामुळे टोमॅटोच्या पुरवठा साखळीवर परिणाम
गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे टोमॅटोच्या पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. मुसळधार पावसाचा कर्नाटक, हिमाचल आणि महाराष्ट्र यांसारख्या टोमॅटो उत्पादक राज्यांमधून जाणाऱ्या ट्रकवर विपरीत परिणाम झाला आहे. त्याचा परिणाम टोमॅटोच्या दरावर दिसून येत आहे. आठवडाभरात टोमॅटोचे दर 60 ते 70 रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे टोमॅटो पिकांवरही विपरीत परिणाम झाला आहे. पावसाळ्यामुळे टोमॅटो सडत असल्याने पुरवठा साखळीवरही परिणाम होत आहे. अशा स्थितीत कमी पुरवठ्यामुळे दरात वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.