विद्यार्थ्यांसाठी आवश्यक कागदपत्रे सुलभतेने देण्याचा शासनाचा उपक्रम. कदम
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
शासनाच्या विविध योजनांचा लाभ हा विद्यार्थी आणि नागरिकांना होत असतो. यासाठी लागणारी कागदपत्रेही तेवढ्या सुलभतेने उपलब्ध व्हावीत यासाठी शासन स्तरावर विविध अभियान राबवण्यात येत आहेत. त्याच बरोबर सध्या प्रवेशाचा कालावधी सुरू असल्याने विद्यार्थ्यांना आवश्यक असणारी कागदपत्रे तात्काळ देण्यात यावीत. यासाठी तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली थेट शाळेमध्ये जावून विद्यार्थ्यांना दाखले वाटप उपक्रम राबवण्यात येत असून त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. असे प्रतिपादन रोपळे मंडलचे मंडल अधिकारी बाळासाहेब कदम यांनी केले.
पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील श्री शिवाजीभाऊ बाबा पाटील विद्यालयामध्ये आयोजीत करण्यात आलेल्या दाखले वाटप शिबीराप्रसंगी मंडल अधिकारी बाळासाहेब कदम बोलत होते. यावेळी काचरे, बागवान, चव्हाण, तपसे, जनहित शेतकरी संघटनेचे औदुंबर गायकवाड, ग्रा.प.सदस्य विलास भोसले, मुख्याध्यापक औदुंबर गायकवाड, विनायक निंबाळकर, नानासाहेब गायकवाड, छत्रपती महा ई सेवा केंद्राचे अभिजीत भोसले, महादेव रितोंड, तलाठी दांडगे, रोपळे मंडलातील महा ई सेवा केंद्र चालक उपस्थित होते.
पुढे बोलताना बाळासाहेब कदम म्हणाले कि, शासनाच्यावतीने राबवण्यात येणार्या उपक्रमांसाठी लोकसहभाग महत्वाचा असून या लोकसहभागामुळे विविध अभियान हे यशस्वी होताना दिसून येत आहे. कोणतीही कागदपत्रे नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये याची दखल घेवून शासनाच्या माध्यमातून दाखले वाटप शिबीर होत आहेत. त्याचा फायदा पालकांना होत असून कागदपत्रे जमवण्यासाठी त्यांची होणारी धावपळ आणि वेळेची बचत होत आहे. यामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक व नागरिकांकडून शासनाच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे. असेही कदम यांनी सांगितले.
आयोजीत करण्यात आलेल्या शिबीरामध्ये रोपळे विद्यालयातील विद्यार्थ्यांना वि विध २५० दाखले देण्यात आले. तर यावेळी उपस्थित अधिकार्यांनी विद्यार्थ्यांना कागदपत्रांबाबत माहिती दिली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विकास आदमिले व शाळेतील शिक्षकांनी परीश्रम घेतले.
विद्यार्थ्यांना शाळेमध्ये दाखले देण्याचा उपक्रम स्तुत्य......
ग्रमीण भागातील पालक हा आपआपल्या कामामुळे व्यग्र असतो. यातून पाल्याच्या कागदपत्रांसाठी धावपळ करताना त्याची मोठी तगमग तर होतेच परंतु वेळही वाया जातो. याची दखल घेवून शाळेमध्ये विद्यार्थ्यांना दाखले देण्याचा शासनाचा उपक्रम स्तुत्य आहे. तर हा उपक्रम रोपळे विद्यालयामध्ये राबवून मंडल अधिकारी बाळासाहेब कदम आणि त्यांच्या टिमने विद्यार्थ्यांप्रती कर्तव्याची भुमिका पार पाडली आहे.
औदुंबर गायकवाड.रोपळे ता.पंढरपूर