अग्नीवीर टाइप योजना
मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
माहिती आणि जनसंपर्क विभागात अधिकारी, कर्मचारयांची वाणवा आहे. या विभागातील अनेक उपसंचालक, जिल्हा माहिती अधिकारी, सहाय्यक माहिती अधिकरयांच्या जागा वर्षानुवर्षे रिक्त आहेत.त्या भरल्या जात नाही. त्यामुळे माहिती आणि जनसंपर्क विभागानं "अग्नीवीर" टाइपची योजना विभागात आणली आहे.
पत्रकारितेचं शिक्षण घेणारया मुलांना आंतर्वासिता अर्थात इंटर्नशिपच्या नावाखाली फुकटात राबवून घेण्याची ही योजना आहे. तीन महिन्यासाठी ही इंटर्नशिप योजना असून या काळात प्रशिक्षण घेणारयांना कोणतेही मानघन, प्रवास भत्ता, अथवा निवास व्यवस्था दिली जाणार नाही असं माहिती जनसंपर्क विभागानं या संबंधात प्रसिध्द केलेल्या जाहिरातीत म्हटलं आहे.
मुद्रीत माध्यम, दृकश्राव्य माध्यम, वेब माध्यम, समाज माध्यम अशा विविध माध्यमांचा जवळून अभ्यास करण्याची संधी मुलांना मिळणार असल्याची "लालूच" या जाहिरातीत दाखविली गेली आहे.
माहिती आणि जनसंपर्क विभाग म्हणजे पांढरा हत्ती झाला आहे.. त्यामुळं सरकारचंही या विभागाकडे लक्ष नाही. परिणामत:विभागातील रिक्त जागाही सरकार भरत नाही. त्यामुळे फुकटचं मनुष्यबळ वापरून घेण्याची ही योजना असल्याचा आरोप एस.एम देशमुख यांनी केला आहे.
प्रत्यक्षात तीन महिन्यात मुलांना खरंच काही शिकायला मिळेल का? याबद्दल आम्ही साशंक आहोत.. कारण माहिती जनसंपर्क विभाग जाहिराती, फिल्म, मुद्रण यासारखी अनेक कामं बाहेरून करून घेत असते.त्यामुळे फुकटात मुलांना राबवून घेणं हाच या योजनेचा उद्देश दिसतो आहे.
पत्रकारितेच्या मुलांना खरंच चांगला अनुभव मिळावा अशी सरकारची प्रामाणिक इच्छा असेल तर मुलांची निवड करून त्यांची मुंबईत राहण्याची व्यवस्था करावी, मुलांना स्टायफंड द्यावा अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेने केली आहे. या संदर्भात लवकरच मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात येणार असल्याचे एस.एम.देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.