मला समजलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.
आपले राष्ट्र घडवायचे असेल, उन्नत बनवायचे असेल तर शिस्तबद्ध नागरिकच हे करू शकतात. संघाचे शिस्तबद्ध स्वयंसेवक गेली शंभर वर्षे हे राष्ट्र घडवण्याचे काम करीत आहेत. अनेक आपत्तीच्या प्रसंगातून देशाला ही गोष्ट प्रत्ययाला आली आहे. संघ कार्यकर्ते आपल्या शरीर व मनाला शिस्त लावून घेतात व या शिस्तीच्या बळावर समाजाच्या कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना ते उत्कृष्ट करतात. एखादा स्वयंसेवक शासकीय नोकरीत असेल तर त्या कार्यालयातील इतर सर्व कर्मचाऱ्यांपेक्षा स्वयंसेवक कर्मचाऱ्याचे काम हे निश्चितच उजवे असते. एखादा स्वयंसेवक शिक्षक म्हणून नोकरी करत असेल तर तो अत्यंत समर्पित भावनेने काम करतानाच दिसून येईल. एखादा स्वयंसेवक व्यापारी असेल तर तो सचोटीच्या मार्गानेच व्यापार करेल, असे आपल्याला अनेक - अनेक उदाहरणातून दिसून येईल. याचाच अर्थ स्वयंसेवक केवळ संघाचे काम शिस्तबद्ध रितीनेच करतात असे नाही तर समाजाच्या भल्यासाठी जे काम करायला हवे ते-ते सर्व काम शिस्तीत करतात.
आपल्या उद्योग व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये अथवा अर्थार्जन करणाऱ्या कोणत्याही कार्यामध्ये स्वयंसेवक समाजाचे व राष्ट्राचे हित पाहूनच आपली सेवा देताना दिसून येतात. असे स्वयंसेवक सार्वजनिक कामांमध्ये देखील याच पद्धतीचा व्यवहार करतात. आपल्या हातून कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही याची सतत काळजी घेत स्वयंसेवक आपले योगदान देताना दिसून येतात. समाज व राष्ट्रावर ज्या - ज्या वेळी संकट आले त्या - त्या वेळी स्वयंसेवक निस्वार्थ भावनेने केवळ धावूनच जात नाहीत तर जे काम करावे लागेल ते संकोच न बाळगता समर्पण वृत्तीने करतात व यातून त्या आपत्तीमध्ये अनेकांना मदत होते. वेगवेगळ्या आपत्तीप्रसंगी ढिगारे उपसून मृतदेहांचा शोध घेण्यापासून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यापर्यंत व स्वतःचा जीव धोक्यात घालून आपतग्रस्तांना मदत करण्यापर्यंत सर्व गोष्टी स्वयंसेवक अत्यंत निस्वार्थीपणाने प्रसिद्धीपासून दूर राहून करतात, याचे कारण म्हणजे संघाची शिस्त होय.
आपल्या वागण्या - बोलण्यातून समाजामध्ये द्वेष - तेढ निर्माण होणार नाही, गट - तट तयार होणार नाहीत याची देखील स्वयंसेवक काळजी घेताना दिसून येतात. प्रत्येक ठिकाणी मागे राहून आपले काम कर्तव्य भावनेने करणाऱ्या शिस्तबद्ध स्वयंसेवकांचे योगदान हे खरोखरच आदर्शवत व प्रेरणादायी असेच आहे. संघ स्वयंसेवकांनी शिस्तीचा आदर्शच भारतीय समाजासमोर ठेवला आहे. संघाच्या कार्यपद्धतीतून निर्माण झालेल्या शिस्तबद्ध स्वयंसेवकांमुळे समाजातील अनेक समस्या आजपर्यंत मार्गी लागल्या आहेत व आजही देशभर चालणाऱ्या दोन लाखांपेक्षा अधिक सेवा प्रकल्पातून समाज व राष्ट्राचे भले करण्याचा प्रयत्न होतो आहे, असे स्वयंसेवक समाजाचा खरोखरच आधार आहेत.
- डॉ.सचिन वसंतराव लादे, पंढरपूर
मो.क्र.७५८८२१६५२६