(लेख शेवटपर्यंत वाचा, वाचून रक्त पेटून उठू द्या..!!)
वरील शीर्षक वाचून बऱ्याच पुस्तकी तत्त्वं जोपासणाऱ्या आलिशान बंगल्यात एसी ची हवा खाणाऱ्या तत्ववेत्यांच्या तळपायाची आग मस्तकाला जाईल,मात्र आजच्या परिस्थितीला धरून हे शीर्षक देण्यात आलं आहे,आणि यासाठी हा पूर्ण लेख वाचवा लागेल अन्यथा, "अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले अभ्यासक आज मितीला कमी नाहीत.."
मागील पाच महिने झालं चंद्रभागा नदीकाठच्या लोकांना शेतीसाठी फक्त दोन तास विद्युत पुरवठा केला जातोय,दोन तासात गाई गुरांना किती पाणी पाजनार, शेतीपिकाला किती पाणी पाजनार..?? किरकोळ उद्योग धंद्यासाठी किती पाणी वापरणार..?? चंद्रभागा नदीकाठच्या शेतकऱ्यांनी या विरोधात कित्येक आंदोलने केली, निदर्शने केली,जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्या झिजवल्या, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने दिली,सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष उपरे पालकमंत्री, सत्ताधारी आमदार-खासदार,नेते यांच्या फार्म हाऊसवर, वाड्यावर, बंगल्यावर जाऊन ही आपलं गाऱ्हाणे मांडले मात्र कोणत्याही मायच्या पुताला पाझर फुटला नाही,फक्त इम्प्रेशन पाडण्यासाठी कोणत्यातरी थातूर मातूर अधिकाऱ्याला फोन लावून डॅशिंग बोलायचं,लोकांना तेथून घरी पाठवायचं,लोकांनी आख्या गावात दिंडोरा पिटायचा साहेब,दादा मालक,बापू,आबा,काका, ताई यांनी अधिकाऱ्यांना फोन करून दम दिलाय,आज पासून नदीकाठच्या मोटारी चालू होणार..,डोंबल्याच्या चालू होणार..???
परिस्थिती जैसे थे..; तुमच्या साहेबांचा आदेश कोलून लावला,त्या जिल्हाधिकाऱ्यांनी,त्या विद्युत अभियंत्यांनी,त्या पाठबंधारे अधिकाऱ्यांनी...
जेंव्हा जेंव्हा शेतकरी संघटनेच्या तरुण पोरांनी आंदोलने केली, तेंव्हा तेथील मुजोर अधिकाऱ्यांनी त्यांना आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पत्रे पुढे केली,जर जिल्हाधिकारीच म्हणत असेल की नदीकाठच्या शेतकऱ्यांना फक्त दोनच तास लाईट द्या तर ...???
प्रश्न हा आहे की तो जिल्हाधिकारी शेतकऱ्यांच्या पोटचा आहे का..??? समजा नसेल तरीही तो कृषिप्रधान भारत देशात जिल्हाधिकारी पदावर काम करण्याच्या लायकीचा आहे का..??
जर तो पाणी पुरवठा व पाऊस पडेपर्यंत पाणी राखून ठेवण्यासाठी नियोजन करतोय तर,चंद्रभागा नदीवरील जे प्रचंड गळती असलेले बंधारे आहेत,काही विघ्नसंतोषी लोक रात्रीच्या वेळी बंधारे फोडतात त्यावर काय प्रतिबंध करतोय का,हफ्ते देणाऱ्या मोठमोठ्या राजकीय लोकांच्या मोठ्या उद्योग धंद्याना प्रचंड पाणी पुरवठा केला जातोय, त्याचं काय..?? उजनी धरण निर्मितीसाठी विस्थापित झालेल्या लोकांना जास्तीतजास्त जमिनी सोलापूर जिल्ह्यातील प्रामुख्याने चंद्रभागा नदीकाठच्या लोकांनी दिल्या आहेत, उजनीच्या पाण्यावर पहिला अधिकार चंद्रभागा नदीकाठच्या लोकांचा आहे, तरीही काही राजकीय नेते आपल्या सत्तेच्या आणि पदाच्या जीवावर आपलं हक्काचे पाणी चोरून घेऊन जात आहेत त्यांच्यावर काय कारवाई केली...
सर्वात महत्वाचा मुद्दा उजनी धरणातून पाण्याच्या पाळ्यांचे नियोजन केलं जातं,आणि पाठीमागे चार महिन्यापूर्वी पाठोपाठ पाण्याच्या दोन पाळ्या गरज नसताना सोडल्या, तेव्हा हे जलतज्ज्ञ अधिकारी आणि पाठबंधारे विभाग झोपेत होता का..???
आज चंद्रभागा नदीकाठच्या शेतकऱ्यांवर शेतीपंपाच्या विजे अभावी आत्महत्या करण्याची वेळ आणली गेली आहे, कारण नदी तुडुंब भरली असताना शेतातील पिके विजेअभावी जळून चालली आहेत,यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी आपापल्या शेतात बोरवेल,विहिरी घेतल्या आहेत,मात्र महावितरण चे महामुजोर अधिकारी नदीकाठची सरसकट वीज तोडत आहेत,त्यामुळे ऐन दुष्काळात व्याजाने पैसे काढून शेतकऱ्यांनी घेतलेल्या विहिरी आणि बोरच्या कनेक्शन ला सुद्धा विद्युत पुरवठा होत नाही,यासाठी विजवीतरण अधिकाऱ्याकडे न्याय मागितला की तो जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची प्रत दाखवतो,जिल्हाधिकाऱ्यांकडे न्याय मागितला की तो पाठबंधारे विभागाने दिलेल्या अहवालाकडे बोट दाखवतो, पाठबंधारे विभाग म्हणतोय भीषण पाणी टंचाई असल्याचे आम्हाला जाणवते म्हणून तसा रेपोर्ट आम्ही देतोय..,त्यांना एक शेतकरी म्हणून प्रश्न आहे की पाणी टंचाईचे संकट अखंड देशावर आहे, मात्र हे निसर्गचक्र आहे, पुढे पाऊस पडणार आहे की नाही, पडणार आहे तेव्हा धरण भरेल की नाही, भरणार आहे, मग आज या दुष्काळी परिस्थिती शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास का हिसकावून घेत आहे..????
मात्र हे पाठबंधारे विभागाचे अधिकारी कधी चंद्रभागा नदीच्या कडेने देखील फिरले नाहीत,की यांनी कोणत्या बंधाऱ्यातून किती पाण्याची गळती होतेय याकडे पाहिले नाही,पाठबंधारे विभागाचे अधिकारी एसी च्या खोलीत बसून कागदी घोडे नाचवत आहेत,यांचा अभ्यास म्हणजे शेखचिल्लीच्या भाकडकथाच म्हणाव्या लागतील कारण हे महाभाग चंद्रभागा नदीतून एकाच वेळी होणाऱ्या दररोज हजारो विद्युत मोटारींचा 24 तास पाणी उपशाचा हिशोब अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना देतात,हाच हिशोब तुम्ही शेतकऱ्यांना विचारला तर तो अतिशय अभ्यासपूर्ण रीतीने मांडेल,एका शेतकऱ्याला तीन ते चार एकर जमीन असते,१० एकराच्या पुढचे बागायतदार बोटावर मोजण्याइतकेच शिल्लक आहेत, आपण लाईट सोडत होता फक्त आठ तास,एक एकर बागायत भिजवण्यासाठी १० एच पी ची मोटार १० तास चालवावी लागते जर आपण दररोज फक्त दहा तास शेती पंपाची वीज सोडली तर फक्त तीन ते चार दिवसात तीन ते चार एकर बागायत ओलिताखाली येतंय,एकदा हे बागायत भिजवलं की किमान १० दिवस पुन्हा पाणी लागत नाही,जे शेतकरी ड्रीप वापरात त्यांना दोन दिवसाआड पाच- सहा तास पाणी सोडलं तर त्यांचं भागतं मग तुम्ही २४ तासाच्या पाणी उपशाचा हिशोब देऊन जिल्ह्याधिकाऱ्यांची,वीज वितरण अधिकाऱ्यांची आणि सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांची सपशेल दिशाभूल करत आहात हे सिद्ध होतंय,मात्र शोकांतिका ही आहे की रात्रंदिवस अभ्यास करून कृषीप्रधान देशातील एका जिल्ह्याचा जिल्हाधिकारी असलेला हुशार माणूस एसी रूम मध्ये बसून तयार केलेल्या पाठबंधारे विभागाच्या अहवालाला प्रमाण मानून अखंड देशाच्या पोशिंद्याला वेठीस धरतोय ही खरी शोकांतिका आहे, तुमच्या असल्या फालतू अभ्यासमुळेच आपला देश रसातळाला गेलाय, कागदी घोडे नाचवण्याच्या नादात चंद्रभागा नदीकाठच्या शेतकरी मायबाप जनतेचा जीव जातोय,बरे हे सर्व करत असताना जमिनीत मुरणाऱ्या पाण्याचा विचार केलाय का..??? बाष्पीभवन होऊन उडून जाणाऱ्या पाण्याचा विचार केलाय का..?? चंद्रभागा नदीवरील सर्व बंधारे एकदम निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे त्यातून होणाऱ्या प्रचंड गळतीचा विचार आपण केलाय का..??? काही शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेले लोक जे रात्री अपरात्री बंधाऱ्यांची दारे सोडून देतात त्यांच्यावर आपण किती कारवाई केली,की हफ्ते मिळाले की तुमची पाणी टंचाई संपते,हे कसलं आलंय आपलं पाणीपुरवठा धोरण..???
आपल्या असल्या जुलमी फतव्यामुळे अधिच अस्मानी संकटामुळे गलितगात्र झालेला चंद्रभागेच्या तीरावरील शेतकरी तुमच्या सुलतानी कायद्यामुळे मरण जवळ करण्याच्या तयारीत आहे, त्यांना वेळीच सावरा,जर तो प्रक्षोभक झाला तर वीजबिल,पाणीपट्टी,शेतसारा,घरपट्टी वसुली करणारे तुमचे वसुली अधिकारी गावात फिरू दिले जाणार नाहीत, त्यांना गावातील शेतकरी ताणून लावतील याची गंभीर दखल घ्यावी,इतकेच नव्हे तर आज जे स्वतःला लोकप्रतिनिधी समजणारे सत्ताधारी आमदार,खासदार शेतकरी अडचणीत असताना मूग गिळून गप्प बसले आहेत,त्यांना देखील याचा हिशोब द्यावा लागणार आहे, सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या रोषाला तुम्हाला सामोरे जावे लागेल, आणि हाच चंद्रभागा नदीकाठचा शेतकरी या भीमथडीच्या तट्टांना या चंद्रभागेचे पाणी पाजल्याशिवाय शांत बसणार नाही हे नक्की...!!*
शब्दांकन:चंद्रभागा नदीकाठी जन्माला आलेला दुर्भाग्यशाली शेतकरी..!!
(चंद्रभागेच्या तिरावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पोटच्या पोरांनी हा लेख प्रचंड व्हायरल करावा, जेणेकरून तो कृषिप्रधान देशाच्या अभ्यासू जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत, राज्याच्या कृषीमंत्र्या पर्यंत, सोलापूर जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष उपऱ्या पालक मंत्र्यापर्यंत आणि निष्क्रिय लोकप्रतिनिधी पर्यंत पोहचेल...!!)