जुजारपूर, हातीद, वाढेगांव मध्ये गाव चलो अभियानाला प्रचंड प्रतिसाद
सांगोला तालुका प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या १० वर्षांत देशाची सर्वांगीण प्रगती करत असताना देशातील गोरगरीब, वंचित, शोषित वर्गालाही विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून सर्वसमावेशक विकासाचा नवा मापदंड तयार केला, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी केले.
भारतीय जनता पक्षातर्फे व्यापक जनसंपर्कासाठी गाव चलो अभियान राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सांगोला तालुक्यातील जुजारपूर, हातीद आणि वाढेगांव या ठिकाणी नागरिकांशी संवाद साधताना चेतनसिंह केदार सावंत बोलत होते.
चेतनसिंह केदार पुढे म्हणाले की, मोदी सरकारच्या कामगिरीची माहिती देण्यासाठी भाजपने महाजनसंपर्क अभियान आयोजित केले आहे. मोदी सरकारने गेल्या १० वर्षांत गोरगरीब, वंचित वर्गाच्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्याचे महत्त्वाचे काम केले. गरीब कल्याण योजनेद्वारे ८० कोटी जनतेला मोफत अन्नधान्य दिले जात आहे. त्याचबरोबर गोरगरिबांसाठी २.५ कोटी घरे आणि ११.७२ कोटी शौचालये बांधण्यात आली आहेत. ९ कोटींपेक्षा अधिक कुटुंबांना उज्ज्वला योजनेद्वारे मोफत गॅस सिलिंडर दिला जात आहे. आयुष्यमान योजनेतून ५ लाखांपर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत दिले जात आहेत. मोदी सरकारच्या कामगिरीमुळेच भारताची अर्थव्यवस्था जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे. या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक बूथवर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पोहोचणार असून संघटन व्यवस्थापन, लाभार्थी भेटी, समाजातील विविध घटकांशी संवाद साधणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष दुर्योधन हिप्परकर, माढा लोकसभा विस्तारक अनंत राऊत, भटक्या विभक्त आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष विजय इगोले, विष्णू हिप्परकर, अजित तवटे, विलास व्हनमाने, मोहन बजबळे, विश्वास करडे, गणेश घाडगे, संजय केदार, प्रदीप घाडगे, महेश घाडगे, गणेश भंडारे, योगेश भगत, संभाजी चव्हाण यांच्यासह भाजपचे बूथ प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.