स्पर्धेच्या युगात आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा - ख्याती फायनान्शिअलचे डायरेक्टर अनिल धरमशी
पंढरपूर प्रतिनिधी
‘स्पर्धेच्या युगामध्ये सर्वजण नुसते धावतच आहेत परंतु ही धाव योग्य दिशेला आहे का? हे देखील पाहणे महत्वाचे आहे. खरे तर आपण पळण्यापूर्वी दिशा ठरवली तर नियोजित ठिकाणी लवकर पोहोचू. यासाठी सर्वप्रथम कोणतेही कार्य करत असताना मनामध्ये सुरवातीला अनेक गोष्टी नकारात्मक येतात. आपण त्या नकारात्मक गोष्टींचा स्वीकार करू नये. सकाळी उठल्यापासून आवडत्या, जबाबदारीच्या आणि चांगल्या कामास सुरुवात करा, त्यामुळे दिवसभर सकारात्मक उर्जा कायम राहील. त्यामुळे आपले ध्येय, जिद्द न सोडता आपण आपले कार्य साध्य करण्याच्या मागे रहा. ध्येय ठरवले की ते साध्य होऊ शकते. जगाचा विचार केला तर स्वतःकडे दुर्लक्ष होते. म्हणून या स्पर्धेच्या युगात सर्वप्रथम आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा.’ असे आवाहन ख्याती फायनान्शिअल अॅडवायझरचे डायरेक्टर अनिल धरमशी यांनी केले.
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, कॉलेज ऑफ फार्मसीच्या पदवी, पदविका व पदव्युत्तर पदवीचे विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच चारही महाविद्यालयातील प्राध्यापकांसाठी फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम (एफडीपी) अंतर्गत ‘पहेला कदम’ (द फर्स्ट स्टेप) या मार्गदर्शनपर उपक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी ख्याती फायनान्शिअलचे डायरेक्टर अनिल धरमशी हे मार्गदर्शन करत होते. स्वेरी गीतानंतर प्रास्ताविकात संस्थेचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी ‘आपल्या हाती घेतलेल्या कार्यात सकारात्मकता कशी असावी, सांघिक कार्य कसे करावे, सर्वांना विश्वासात घेऊन सर्वांच्या सहकार्याने कसे नेतृत्व करावे? हे सांगताना त्यांनी खर्डीतील वस्तीवरील साध्या झोपडीतून सुरु झालेल्या प्रवासात जिद्द, कठोर मेहनत व आत्मविश्वासाच्या बळावर मिळविलेल्या यशाचे गुपित सांगताना त्यांनी आयुष्यामध्ये सकारात्मक विचार केल्यास भविष्यात प्रचंड फायदा होतो.’ असे सांगितले. प्रमुख पाहुणे सल्लागार धरमशी पुढे म्हणाले की, ‘शुद्ध हवा आणि शुद्ध मन एकत्र आले तर आपण ठरवलेले ध्येय पूर्ण करू शकतो. यासाठी आपल्या कार्यात आपण प्रामाणिक रहा. यातून करत असलेल्या कार्यातील पारदर्शकता कोणाचीही शिफारस नसताना समजून येते. कोणी खुश होईल असे काम न करता जे काम करायला हवे तेच करावे. यामुळे काही काळ आपला बॉस नाराज होईल पण कार्यातील दर्जा, न्यायप्रियता व पारदर्शकता पाहिल्यास बॉसचा बॉस देखील प्रेरीत होतो. ज्यावेळी माणूस स्वतः प्रामाणिक असतो तेव्हा तो जिद्दीने पेटतो. त्यावेळी विश्व देखील ठेंगणे असते. यासाठी आपण नेहमी सकारात्मक विचार करणे गरजेचे आहे. जीवनात गुरुजनवर्ग, आई व वडील यांचा मानसन्मान ठेवा. कारण गुरु, आई व वडिलांची कवच कुंडल तुटतील एवढे आपण कदापी मोठे होत नाही. असे म्हणून त्यांनी आईचे महात्म्य सांगितले. यावेळी धरमशी यांनी स्वामी विवेकानंद, थॉमस एडिसन, शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, आर. डी. बोरा, उद्योजक मुकेश अंबानी, अजिज प्रेमजी, के. एन. जी. रेड्डी, शास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर, डॉ.अवधूत परळीकर, डॉ.किरण मुजुमदार यांच्या नेतृत्वाच्या आणि कार्य करण्याच्या पद्धतीवर अभ्यासपूर्ण प्रकाश टाकला. या ‘पहेला कदम’ उपक्रमासाठी अभियांत्रिकी, फार्मसी, एमबीए, एमसीए मधील विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्यासाठी दोन दिवसात आठ स्वतंत्र बॅच करून कार्यात सकारात्मकता, स्मार्ट वर्क याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम.पवार, बी.फार्मसीचे प्राचार्य. डॉ. एम.जी. मनियार, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा.एस.व्ही.मांडवे, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. एम.एस. मठपती, एफडीपी समन्वयक प्रा. मीनल भोरे, प्रशासन अधिष्ठाता डॉ.आर.आर. गिड्डे, शैक्षणिक अधिष्ठाता व सिव्हील इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ.पी.एम.पवार, प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता प्रा. के.बी. पाटील, पब्लिसिटी अँड प्रोटोकॉल अधिष्ठाता डॉ. डी.एस. चौधरी, ट्रेनिंगचे अधिष्ठाता प्रा. ए.ए. मोटे, संशोधन विभागाचे अधिष्ठाता डॉ. ए. पी.केने, रजिस्ट्रार आर.जी. झरकर, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. एस. बी.भोसले, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.मिनाक्षी पवार, कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.स्वाती पवार, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.डी.ए. तंबोळी, प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ.एस.ए.लेंडवे, सांस्कृतिक कार्यक्रम विभागप्रमुख डॉ.वाय. एम.खेडकर, वर्कशॉप इन्चार्ज प्रा. बी.डी.गायकवाड यांच्यासह इतर प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व अभियांत्रिकी व फार्मसीच्या चारही महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. डॉ.एन.पी.कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले तर पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन. डी. मिसाळ यांनी आभार मानले.