योगेंद्र यादव यांच्याकडून गावच्या एकीचे विशेष कौतुक
चिंचणी प्रतिनिधी
सोलापूर येथील छाया-प्रकाश फाऊंडेशन तर्फे दिला जाणारा मानाचा ऊर्जा पुरस्कार पंढरपूर तालुक्यातील चिंचणी पर्यटन केंद्रास राष्ट्रीय राजकीय विश्लेषक आणि सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी व्यासपीठावर आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या ख्यातनाम गायिका अश्विनी भिडे-देशपांडे, दिग्दर्शक नागराज मंजुळे, पत्रकार राजू परुळेकर, भगवान रामपुरे, स्वाती शहा, अजित शहा, पुष्पा आगरकर, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
ग्रामस्थांच्या वतीने हा पुरस्कार सविता सावंत यांनी स्विकारला. सातारा जिल्ह्यातील कण्हेर धरणामुळे विस्थापित झाल्याने पंढरपूर तालुक्यातील माळरानावर पुनर्वसित झालेले चिंचणी हे ६५ कुटुंबाचे गाव! या गावाने मागील ५०-५५ वर्षात एकीच्या जोरावर दहा हजार हुन अधिक झाडे लावून ती जोपासत प्रतिमहाबळेश्वर निर्माण केले आहे. गावातील लोकांना गावातच रोजगार निर्माण झाला पाहिजे आणि जगण्याची लढाई अधिक सोपी व्हावी या उद्देशाने 'वरदायिनी' महिला बहुद्देशीय संस्था स्थापन करून त्या माध्यमातून ग्रामीण कृषी पर्यटन चालू केले. हे करताना भांडवल उभे करण्यासाठी प्रत्येक महिलेने आपले स्त्रीधन पणास लावले आणि ४५ तोळे सोने गहाण ठेवले. विशेष म्हणजे आख्ख्या गावाच्या मालकीचे असणारे आणि स्त्रियांकडून चालविले जाणारे चिंचणी हे एकमेव कृषी पर्यटन केंद्र आहे. सदर कृषी पर्यटन केंद्रात येणाऱ्या पर्यटकांना ग्रामस्थांनी त्यांच्याच शेतात सेंद्रिय पद्धतीने पिकविला जाणारा हुरडा, फळे, भाज्या आणि भारतीय संस्कृतीतील ग्रामीण अन्नपदार्थांचा आस्वाद दिला जातो. गावातील महिलांचे गट करून दर आठवड्याला एका गटावर पर्यटन केंद्राची जबाबदारी दिली जाते. अशा पद्धतीने गावातील शंभर टक्के महिलांकडून चालवले जाणारे चिंचणी हे एकमेव पर्यटन केंद्र आहे. त्यामुळे त्याच्या ह्या एकीच्या कार्याची दखल घेऊन छाया प्रकाश-फाउंडेशनने त्यांचा ऊर्जा पुरस्कार देऊन गौरव केला आहे.
योगेंद्र यादव यांच्याकडून चिंचणी ग्रामस्थांचे कौतुक
चिंचणी ग्रामस्थांची यशोगाथा ऐकून प्रभावित झालेल्या राष्ट्रीय राजकीय विश्लेषक व सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव यांनी पुरस्कार वितरण करताना सभागृहात उपस्थित असणाऱ्या सर्व चिंचणी ग्रामस्थांना उभे राहण्याची विनंती करून टाळ्या वाजवत त्यांचे कौतुक केले. शिवाय पुरस्कार वितरण सोहळ्यनंतर पार पडलेल्या चर्चा सत्रावेळीही चिंचणीचा उल्लेख करत राष्ट्र निर्मितीचे आणि राष्ट्र उभारणीचे हेच खरे कार्य असल्याचे सांगितले. तेव्हा सभागृहानेही त्यास टाळ्यांचा गजरात दाद दिली.