सोलापूर प्रतिनिधी
श्री बृहन्मठ होटगी मठाचे परमपूज्य गुरुवर्य लिं. श्री ष .ब्र. तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या सहाव्या पुण्यस्मरणानिमित्त नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस कन्नड भाषा व कन्नड संस्कृती संवर्धक कुंभार समाज शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने रविवारपासून बौद्धिक व्याख्यानमालेस प्रारंभ होत आहे. यावर्षी महाराष्ट्रातील नामवंत व्याख्यात्यांची बौद्धिक मेजवानी मिळणार आहे.
रविवार दि. १७ रोजी सायंकाळी सहा वाजता व्याख्यानमालेचे उदघाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अण्णाराव कुंभार यांच्या हस्ते होणार आहे. कवी नारायण सुमंत हे 'वारी ते बारी' या विषयावर पहिले पुष्प गुंफणार आहेत.कवी नारायण सुमंत हे नामवंत कवी असून त्यांची महाराष्ट्रात अत्तापर्यंत हजारो व्याख्याने झाली आहेत.प्रत्येक साहित्य संमेलनात योगदान असते.शेतक-यांची दशा-दिशा माहिती असल्याने ग्रामीण कवी म्हणून प्रसिद्ध आहेत.
सोमवार दि. १८ रोजी प्रा.डॉ.विनोद बाबर हे दुसरे पुष्प गुंफणार आहेत. 'आयुष्य सुंदर आहे' हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे.बावर हे प्रेरणादायी वक्ते व शिवचरित्राचा अभ्यासक आहेत.विविध विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर कार्यरत असून अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत.
मंगळवार दि.१९ रोजी सुप्रसिद्ध कवी प्रा.प्रवीण दवणे हे 'दीपस्तंभ: मनातले जनातले' या विषयावर शेवटचे पुष्प गुंफणार आहेत.दवणे हे मराठीचे ज्येष्ठ साहित्यिक आहेत.त्यांचे अनेक मराठी वांडमय प्रसिद्ध आहेत.१५० पेक्षा जास्त चित्रपटात त्यांनी विविध गाणे गीत बद्ध केले आहेत.तरी श्रोत्यांनी या बौद्धिक व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा असे आवाहन व्याख्यानमालेचे प्रमुख प्राचार्य रविशंकर कुंभार यांनी केले आहे.