सोलापूर प्रतिनिधी
आयुष्याच्या सुरुवातीला खरे दीपस्तंभ म्हणजे आपले आई आणि वडील.आई वडिलांमुळेच आपल्याला जग पहाते आले. त्यांचे मार्गदर्शनच आपले खरे दीपस्तंभ ठरते असे प्रतिपादन प्रा.प्रविण दवणे यांनी केले.
श्री बृहन्मठ होटगी मठाचे परमपूज्य गुरुवर्य लिं.श्री ष.ब्र. तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या सहाव्या पुण्यस्मरणानिमित्त नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस कन्नड भाषा व कन्नड संस्कृती संवर्धक कुंभार समाज शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने आयोजित 'तपोरत्नं बौद्धिक व्याख्यानमाले'प्रसंगी तिसरे व शेवटचे पुष्प गुंफताना प्रवीण दवणे बोलत होते.' दीपस्तंभ मनातले व जनातले' हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता.
ते पुढे म्हणाले,साधू संत जिथे असतात तेच आपले जीवनाचे खरे दीपस्तंभ असतात. मोबाईलच्या दुनियेत दीपस्तंभ हरवलेल्या जगात आजची पिढी जगत आहे. आचार्य प्र.के.अत्रे, पु.ल.देशपांडे, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, आशादीदी , लतादीदी व अटलबिहारी वाजपेयी हे समाजाचे खरे दीपस्तंभ असल्याचे सांगितले.
दवणे पुढे म्हणाले, गरिबी सारखे दुसरे विद्यापीठ नाही व संघर्षासारखा दुसरा गुरु नाही हे सांगत असताना त्यांना आलेल्या अनुभवातून त्यांच्या जीवनातील दीपस्तंभ असणारे उदाहरणं देत दीपस्तंभाचे महत्व पटवून दिले. हातातील मोबाईल ज्ञानसाधनेचे कारण न बनता विसरण्याचे साधन बनले आहे. गुगल म्हणजे समुद्र आहे तेथून मोती काढायचे की चिखल काढायचे हे आपण ठरवायचे. भंजन म्हणजे रंजन असा काळ आला आहे. तारुण्यात चुकलो तर आयुष्यात यु टर्न नाही यामुळे धावतो तो झरा आणि थांबतो ते डबकं.
दवणे पुढे म्हणाले, सुखी माणूस कधी कलावंत होऊ शकत नाही.कारण त्याच्या आयुष्यात संघर्ष असतोच. समाजातील प्रत्येक घटकात दीपस्तंभ शोधणे गरजेचे आहे. ज्या पैशाला श्रमश्री नाही तो पैसा टिकत नाही म्हणून श्रमाने व कष्टाने पैसा कमवावे.
दवणे हे आपल्या खास आणि सुंदर अश्या शैलीत रसिकांची मने जिंकली .