सोलापूर प्रतिनिधी
आजकाल आपण नाती विसरलो आहे.घरातील व्यक्तीसाठी आपल्याकडे वेळ नाही.आजची पिढी सोशल मीडियावर आठ-दहा तास घालवते परंतु घरातील, नात्यांतील व्यक्तीशी बोलायला वेळ नाही म्हणून प्रत्येकांनी आयुष्य सुंदर जगण्यासाठी रक्ताच नात जपावे असे प्रतिपादन प्रा. डॉ.विनोद बाबर (कराड) यांनी केले.
श्री बृहन्मठ होटगी मठाचे परमपूज्य गुरुवर्य लिं. श्री ष.ब्र. तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या सहाव्या पुण्यस्मरणानिमित्त नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस कन्नड भाषा व कन्नड संस्कृती संवर्धक कुंभार समाज शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने आयोजित 'तपोरत्नं बौद्धिक व्याख्यानमाले'प्रसंगी दुसरे पुष्प गुंफताना विनोद बाबर बोलत होते. 'आयुष्य सुंदर आहे' हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता.
बाबर पुढे म्हणाले, भारतात छत्रपती शिवाजी महाराजांसारखे प्रेरणा देणारे व्यक्ती आहेत पडद्यावरच्या चित्रापेक्षा इतिहासातले चित्रातून प्रेरणा घेणे गरजेचे आहे .आजची आई मोबाईल स्क्रीनवर हात फिरवण्यापेक्षा, आपल्या मुलांच्या तोंडावर मायेचा हात फिरवणारी आई पाहिजे. आयुष्यातला वेळ मोबाईलवर घालवण्यापेक्षा, सोशल मीडियावर घालवण्यापेक्षा, स्टेटसमध्ये आपला वेळ देण्यापेक्षा आपल्या यशस्वी कारकीर्दीकडे लक्ष द्यावे. यशस्वी होण्यासाठी वेळेला महत्त्व देणे आवश्यक आहे, यशाने आईच्या डोळ्यातील पाणी व बापाचे फुगलेली छाती आपल्या आयुष्याची खरी कमाईची पावती असेल. जगात दोनच व्यक्ती महत्त्वाचे एक आई व दुसरा बाप.
बाबर पुढे म्हणाले, भक्तीची पायरी म्हणजे नामदेव पायरी, शक्तीची पायरी म्हणजे रायरेश्वराच्या मंदिराती जगदीश्वराची पायरी. आयुष्यात नेहमी कर्तृत्वाने छत्रपती बना.आई-वडिलांना वाईट वाटेल असे कृत्य करू नका. अडचणीत धावून येणाऱ्या मित्राशी संगती करा. नैतिकता जीवनात फार महत्त्वाचे आहे. शिवाजी महाराजांनी नैतिकता पाळली म्हणून साडेचारशे वर्षानंतर देखील शिवराय आपल्या मस्तकात आहेत.
ते पुढे म्हणाले, आपल्या आई-वडिलांशी सन्मानाने वागा. कोणाचे चुकीचे वागले तर मोठ्या मनाने माफ करा.संत सावता माळी सारखे कामात निष्ठा बाळगा. आपल्या कामातच पंढरपूरचा विठ्ठल आपल्याला दर्शन देईल असे प्रतिपादन विनोद बाबर यांनी याप्रसंगी केले.
आपल्या भारदस्त अशा आवाजात कराडकरांच्या शैलित आयुष्य सुंदर आहे याचं सोनं करा असे आवाहन या प्रसंगी ते केले.