पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
मागील दोन दिवसापासून झालेल्या अवकाळी पावसामुळे पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
याबाबत परिचारक यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले आहे.
यामध्ये आधीच दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्यामुळे पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील शेतकरी आपली पिके जगविण्यासाठी संघर्ष करीत होते. मात्र गेले दोन दिवस सलग झालेल्या अवकाळी पावसामुळे पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मंगळवेढा तालुक्यातील ज्वारी पूर्णपणे जमीन दोस्त झाली असून पंढरपूर तालुक्यात फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. या अवकाळी पाऊसामुळे द्राक्षे, डाळींब, मका, ज्वारी आदी फळबागा, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अगोदरच दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. पावसाअभावी खरीप हंगाम वाया गेला असून शेतकऱ्यांची सारी मदार रब्बी पिकांवरच अवलंबून आहे. पाऊस नसताना शेतकऱ्यांनी मेहनत करून जगवलेल्या पिकांची या अवकाळी पावसाने मोठी हानी झाली आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा मोठ्या संकटात सापडला आहे.
अनेक ठिकाणी शेतीतील उभी पिके जमीनदोस्त झाली असून द्राक्षे, डाळींब, मका, ज्वारी आदी फळबागा, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पाऊसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचानामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत लवकरात लवकर मिळावी अशी मागणी मा.आ.प्रशांत परिचारक यांनी केली.