शिरभावी प्रतिनिधी
पूर्वीपासूनच शेती व्यवसायाची परंपरा चालत आलेली आहे. पूर्वीपासूनच शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसायाकडे पाहिले जात आहे. शेतीला पूरक किंवा जोडधंदा म्हणून शेतकरी दूध व्यवसायाकडे पाहत आहे. मात्र मध्यंतरी दूध दरात वाढ झाल्यामुळे तरुण वर्ग ही दूध व्यवसायाकडे वळाला आहे. कोविड प्रादुर्भावानंतर पहिल्यांदाच दूध व्यवसायात उभारी आली आणि दुधाचे दर वाढले. परिणामी कोविडमध्ये उध्वस्त झालेला शेतकरी व तरुण वर्ग या व्यवसायात मोठया संख्येने उतरला. लाखो रुपये किंमतीच्या संकरीत दुधाळ गायी व म्हशी खरेदी करून आपल्या संसाराची विस्कटलेली घडी बसवण्यासाठी प्रयत्न करू लागला. परंतु हा आनंद चिरकाल टिकून न राहता त्यावर विरजण पडले.
ऐनदिवाळीत दुधाचे खरेदी दर कमालीचे घटले. त्यामुळे ऐनदिवाळीत दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचे दिवाळे निघाले आहेत. पावसाअभावी चारा संकट ओढावले आहे आणि सोबतच दुधाचा खरेदी दरही कमी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे व तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. खासगी दूध संघाकडून कवडीमोल दराने दुधाची खरेदी सुरू असून दूध उत्पादक शेतकऱ्यांवर मात्र तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाण्याची वेळ आली आहे. शासनाने नेमलेल्या समित्या फक्त कागदावरच राहिल्याने दूध उत्पादक मात्र दराअभावी देशोधडीला लागत आहे. चालू वर्षी आवश्यक तेवढा पाऊस न झाल्याने पशुधनाचा चारा प्रश्न ऐरणीवर आला आहे. उन्हाळ्याच्या भीषण झळा आत्ताच चटका देत आहेत. त्याचा विपरीत परिणाम दूध व्यवसायावर होत असून दूध उत्पादन घटत चालले असताना दूध खरेदी दर कमी कसा? असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रत्यक्षात उत्पादन खर्चाएवढा देखील दर सध्या मिळत नसल्याचे वास्तव चित्र दिसून येत आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांनी जगावे की मारावे हा ही प्रश्न निर्माण होत आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुपटीने तोटा सहन करावा लागत आहे. त्यात जनावरांच्या पोषण आहार यांच्या किंमतीवर शासनाचे नियंत्रण नसल्याने अव्वाच्या सव्वा भावाने विक्री होत आहे. एकीकडे शेतकऱ्यांचे दूध कमी दराने खरेदी केले जात आहे. तर दुसरीकडे पशुखाद्याचे दर आजही अंदाजे 1700 ते 1950 रुपये असल्याने त्या दरात काहीच फरक नसल्याने सर्वत्र शेतकरी व तरुण वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.
सणासुदीच्या तोंडावर दूध खरेदी दरात घसरण झाली आहे. पशुखाद्याचे दर वाढत असताना; दुधाला चांगली मागणी असतानाही दर खरेदी दरामध्ये कपात केली जात आहे ही चिंताजनक बाब आहे. बँकेचे, पतसंस्थेचे कर्ज घेऊन तरुण या व्यवसायात गुंतला आहे. त्यांना याचा मोठा आर्थिक फटका या दूध दर कपातीमुळे बसणार आहे. दूध दर कपातीमुळे काढलेले कर्ज फिटणार कसे? हा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. यामुळे नव्याने दूध धंद्यात शेतकरी व तरुण वर्ग कर्जाच्या विळख्यात अडकणार आहे. दुग्धजन्य पदार्थांना मागणी असूनही दूध खरेदी दरात कपात केल्याने संकट वाढले आहे. यामुळे दूध उत्पादक शेतकरी व तरुण वर्ग हताश झाला आहे ; तो पुरता हवालदिल झाला आहे. त्यामुळे सरकारने योग्य तो हस्तक्षेप व मध्यस्थी करून योग्य तो निर्णय घेऊन दूध खरेदी दराचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा अशी नम्र विनंती प्रा.डॉ. नागन्नाथ घोरपडे यांनी केली आहे.