नवी मुंबई प्रतिनिधी सुभाष हांडे देशमुख
नवी मुंबई येथील सानपाडा मधील महाराष्ट्र आर्य वैश्य समाज, बोंगिरवार भवन मधे दि. २९.१०.२३ रोजी कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून श्री. भरतभाऊ यमसनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सप्तक म्युझिकल ग्रुप प्रस्तुत..."तोच चंद्रमा नभात.." हा समाज बांधवांसाठी मराठी हिंदी गाण्यांनी बहरलेला कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, विरार येथून समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम अधिक यशस्वी केला.
प्रामुख्याने परस्परांतील विश्वास अधिक दृढ व्हावा, एकमेकाचे प्रश्न समजून घेता यावेत, चर्चा घडवून यावी या उद्देशाने दरवर्षी कोजागिरी पौर्णिमा महोत्सव अतिशय हर्षोल्होसात महाराष्ट्र आर्य वैश्य कमिटी कडून साजरा केला जातो. नोकरी, व्यवसाय, इतर कौटुंबिक अडचणी यामुळे एकमेकांच्या लवकर भेटी होत नाहीत म्हणूनच अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने एक छोटेसे गेट टूगेदरच महाराष्ट्र आर्य वैश्य समाज मुंबई घडवून आणत आले आहे. आणि दिवसेंदिवस त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे.
यावर्षी अंकुश हाडवळे यांच्या सप्तक म्युझिकल ग्रुपच्या पराग दामुद्रे, तुषार कुमार, सतीश परब, क्षमा खडतरकर, सुवर्णा शेळके, राजश्री आडीवरेकर या गायक गायिकांनी मराठी हिंदी गाणी गाऊन रसिक प्रेक्षकांची वाहवा मिळवली. तसेच अंकुश हाडवळे यांनी सादर केलेल्या झिंगाट गाण्यावर सर्वांनी मनमुराद नृत्य करून वातावरण अधिक संगीतमय केले.
आर्य वैश्य भगिनी मधु बच्चेवार यांनी देखील दोन गाणी गाऊन आपले गायन कौशल्य सर्वांसमोर प्रस्तुत करुन वाहवा मिळवली. तसेच किशोर कुमार म्हणून मित्रवर्गामध्ये सुप्रसिद्ध असलेले मोहन नळदकर व त्यांच्या सुविद्य पत्नी सीमा नळदकर यांनीही बहारदार गीत सादर करून उपस्थितांना गाण्यावर ठेका धरायला लावला.
महाराष्ट्र आर्य वैश्य कमिटीच्या सर्व सदस्यांनी हा कार्यक्रम उत्तम रीतीने संपन्न होण्यासाठी मोलाची मदत केली. सचिव केदार नळदकर, खजिनदार सचिन बोकीलवार आणि सुचित्रा कुंचमवार यांचे विशेष सहकार्य लाभले.