जोगेश्वरी, मुंबई प्रतिनिधी पूनम पाटगावे
सध्या मराठी चित्रपटसृष्टीला चांगलेच दिवस आलेत. नुकताच प्रदर्शित झालेला केदार शिंदे दिग्दर्शित आणि माधुरी भोसले निर्मित बाईपण भारी देवा हा प्रत्येक व्यक्तीने पाहावा असा चित्रपट आहे. मानवी नातेसंबंधावर भाष्य करणारा असा हा चित्रपट आहे. हा चित्रपट पाहताना प्रेक्षकांच्या मनाला अलगदपणे हात घालण्याचे काम करतोय. या चित्रपटातील सहा बहिनींचे व्यक्तिमत्व हा चित्रपट पाहणाऱ्या प्रत्येक बाईच्या नकळत का होईना आयुष्यात वाट्याला आलेले आहे. मनुष्य जन्मापासून मृत्यूपर्येंत माणसाला जीवनात यश मिळवण्यासाठी अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते. अशा कठीण प्रसंगांना सामोरे जाऊन निराशावादी न बनता त्या प्रसंगातून यश कसे संपादित करता येईल, हे या चित्रपटातून समोर दिसून आले आहे. आयुष्यात यश, कीर्ती, संपत्ती मिळवण्यासाठी जन्मापासून मरेपर्यंत स्पर्धा चालू असते. आणि ही स्पर्धा मरेपर्यंत माणसाच्या आयुष्यात चालूच असते.
अशा स्पर्धात्मक आयुष्यात यश, कीर्ती, संपत्ती मिळवण्यासाठी अनेकदा नातेसंबंध दुरावण्याचा प्रसंग समोर येतो. आयुष्यात या सगळ्याला सामोरे जाताना आपल्या पदरी कधी यश लागतं तर कधी अपयश. आयुष्यभर संघर्ष करूनही अनेक पदे, डिग्री, गौरव मिळुनही आपली माणसं जर जवळ नसती तर आपल्याला यश मिळूनही समाधानाचं सुख मिळत नाही. सध्यस्थितीत नातेसंबंध इतके का दुरावत चाललेले आहेत की त्यांना देण्यासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ शिलक्क नसतो. अलीकडील काळात प्रत्येक व्यक्ती शिक्षण, नोकरी यनिमित्ताने विखूरलेला आहे. आणि याच शिक्षण व नोकरीतील जबाबदारी सांभाळता सांभाळता एकमेकांना भेटणेही मुश्किल झाले आहे. पण काहीही असो, "आयुष्यात ब्रेक हा हवाच, किमान स्वतःसाठी तरी", हे बाईपण भारी या चित्रपटाच्या माध्यमातून बऱ्याचजनांना समजले. अशा या धकाधाकीच्या जीवनात सांसारिक व्यापातून, अनेक जबाबदाऱ्या पार पाडत असताना त्यातूनच एखादा ब्रेक घेऊन स्वतःसाठी का होईना वेळ दिला पाहिजे.
बाईपण देगा देवा..... अन पुरुषीपण घेगा देवा! या कथित वाक्याचे गांभीर्य आज आपल्याला बाईपण भारी देवा! या चित्रपटाच्या निमित्ताने समोर आले. या चित्रपटाच्या निमित्ताने सर्वांनी फक्त स्त्रियांचाच एकतर्फी विचार करून चालणार नाही, तर पुरुषी मानसिकता पण जाणून घ्यायला हवी. बाहेरून दिसणारा तो निडर पुरुष पण कधीकधी आयुष्यातील काही घटनांमुळे काही प्रसंगी खचून जातोच. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाना न डगमगता सामोरे जातो.
संकटातून आपल्या यशाचा मार्ग निवडतो आणि परिथितीत समतोल राखतो. त्याच्या आयुष्यात घडलेल्या काही बऱ्यावाईट प्रसंगामुळे देखील त्याची मानसिकता खचून जाते. पण आयुष्याच्या या रहाटगाड्यात समोर आलेल्या परिस्थितीशी चार हात करून लढण्याची ताकत जशी स्त्रियांकाडे असते तशीच ती पुरुषांकडे असते. स्त्रिया जशा आपल्या भावनांना मोकळी वाट करून देतात तशीच गरज पुरुषांनादेखील असते, फक्त गरज आहे ती त्यांना जाणून घेण्याची.
त्यांनाही मन आहे, आपल्या भावना मोकळ्या करण्यासाठी वाट हवी असते. आज बाईपण भारी देवा या चित्रपटाच्या निमित्ताने मानवी संबंधावर भाष्य करण्याच्या ओघात फक्त स्त्रियांचाच विचार न करता, पुरुषीपण भारीच देवा! असे म्हटले तर नवल वाटायला नको.