आळंदी प्रतिनिधी मल्हारभाऊ काळे
अंकली येथील ( बेळगाव, कर्नाटक ) शितोळे सरकारांच्या वाड्यातून प्रस्थान झालेल्या श्रींचे अश्वांचे आळंदीत हरिनाम गजरात आगमन झाले. तत्पूर्वी सरदार हरप्रीतसिंह बिडकर यांचे श्रीकृष्ण मंदिरात अश्वांचे जोरदार स्वागत परंपरेने करण्यात आले.
हिरा आणि मोती अश्व अलंकापुरीत येण्यापूर्वी पुण्यात पाहुणचार घेत हरिनाम गजरात आळंदीत आले. आले आहेत. सरदार हरप्रीतसिंह बिडकर, उमेशजी बिडकर परिवाराच्या वतीने अश्वांचे परंपरेने स्वागत करण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील परंपरेने श्रीगुरु हैबतबाबा दिंडीने सामोरे जात अश्वांचे स्वागत विसाव्याचे जवळ करण्यात आले.
या प्रसंगी आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे पाटील, माजी विश्वस्त अभय टिळक, पालखी सोहळा मालक बाळासाहेब पवार, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील गोडसे, श्रीमंत उर्जीतसिह शितोळे सरकार, महादजी शितोळे सरकार, श्रींचे सेवक राजाभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार, माऊलींचे मानकरी योगीराज कुऱ्हाडे, योगेश आरु, स्वामी सुभाष महाराज, दशरथ चवरे, आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, हमीद शेख यांचेसह आळंदीकर ग्रामस्थ, वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित होते.
सोहळ्यातील परंपरेने अश्वांचे माउली मंदिरातही देवस्थानचे वतीने स्वागत झाले. आळंदीत येथील फुलवले धर्मशाळेत परंपरेने अश्वांचा मुक्काम राहणार आहे. येथे भाविक दर्शनास गर्दी करतात.