विशेष लेख
बाईला दिली जातात दूषणं
पुरुषांकडून आणि बायांकडूनही
हिणवत राहतात
आणि धिक्कार करतात त्यांच्या वडाला पूजण्याचा
त्यांना वाटतं वडाच्या झाडाला पूजणार्या सावित्रीनं बनावं फुल्यांची सावित्री
म्हणून ते विचारात राहतात, “बये, तू कोंची सावित्री?”
त्यांना मनापासून सांगावं वाटतं
पुरुषांनी पुरुषांसाठी लिहीलेल्या सगळ्याच धर्मग्रंथांना आधी दोष द्या
ज्यांनी बाईला संसारात आणि कर्मकांडात गुंडाळलं
आणि उंबर्याआडच्या प्रतिष्ठेलाच तिचं विश्व केलं
दूषणं द्यायची असतील तर त्या कुटुंबाला, समाजाला द्या
जो बाईला जन्मच
तिला सगळ्या लक्ष्मणरेषा पाळाव्या लागतील
या अटीवर देतो
दूषणे द्यायचीच तर त्या पुरुषांना द्या
जे पायातली चप्पल पायात राहावी म्हणतात
नाही तर फेकून देतात तिला संसारातून चपलेसारखी,
परत पायात न घालण्यासाठी
दूषणेच द्यायची तर त्या पितृसत्ताक पद्धतीला द्या
ज्यात बाईचे पावित्र्य ठरवण्यासाठी तिची नग्न धिंड काढली जाते,
तिला पुन्हा पुन्हा ‘अपवित्र’ करण्यासाठी
जबाबदार धरायचच आहे तर त्या सत्ताधीश पुरुषांना धरा
जे बाईच्या हातात सत्ता आली तरी दाबतात तिला पदोपदी
आणि तिचा "जोतिबाची सावित्री" बनण्यासाठीचा अवकाश गोठवून टाकतात
कुण्याही बाईच्या डोक्यात सत्तेचा विचारही रुजू नये म्हणून
स्त्रीच्या वडाला फेरे घालण्याला ते पोलीस आणि न्यायालयेही जबाबदार आहेत
जे सत्यवानाच्या अन्यायाविरुद्ध दाद मागणार्या सावित्रीला रिकाम्या हाती परत पाठवतात,
त्याच सत्यावनाकडे,
वडाला फेरे घालण्यासाठी
दोषी तर ते वडीलही आहेत जे पोटच्या गोळ्याचे अश्रू दूर्लक्षित करतात
पण ' चिमणे, परतून ये घरट्यात ' एवढंही बोलत नाहीत
आणि पोरगी जीवानीशी गेली की मेलेल्या पोरीला न्याय देण्यासाठी धावाधाव करतात,
निरर्थक
आणि त्या सरकारकडे का डोळेझाक करता आहात
जे घरट्यातून बाहेर पडण्याची तिला देत नाही
हिंमत निवार्यासकट
दोष तर त्या भावांनाही द्यायलाच हवा
जे बहिणीच्या हक्काची संपत्ती " प्रेमाचे भावनिक वचनाने" हडपतात
आणि सोडून देतात तिला लंकेची पार्वती बनण्यासाठी
त्या नवऱ्याना आपण काहीच म्हणणार नाही का जे बायकोने फेरे मारल्यावर खुश होतात
आणि तिच्या ब्रने अर्धमेली तिला खाली घेतात योनी गलीतगात्र होईस्तोवर
शेवटी सोडतात रस्त्यावर मुलाबाळांसकट, कधीही घरात न घेण्यासाठी
आणि खरे दोषी तर तेच आहेत जे समतेचे शिलेदार म्हणवतात,
जे झुंडीझुंडीने चाखत राहतात पितृसत्तेची फळे
पण ' वडाच्या झाडाला फेऱ्या घालणं ही बाईची निवड आहे का?'
असा प्रश्नही न पाडता लेबल लावून मोकळे होतात;
पुरुष अन बायाही शिकवत राहतात तिला समता आणि सावित्रीच्या गोष्टी
'पुरोगामी ' म्हणून मिरवण्यासाठी
बाईला दूषणे देण्याआधी जमलंच तर केवळ गर्भात न मारली गेल्याने जन्मलेल्या
तिच्या पायातील पितृसत्तेच्या बेड्या आणि कपाळावरील दास्याचं कुंकुही पाहा
जरा दिसतोय का बघा तिच्या वर्तुळांनी बंदिस्त डोळ्यातील आक्रोश
आणि आलचं मनात तर तिच्या मारलेल्या स्वप्नांवरही एक नजर टाकाच
बाईला निखळ आनंद घेऊ शकणार्या त्या नसलेल्या जागांबद्दल विचार कराल काय,
ज्या जागा फक्त तिच्याच असतील, त्या वडाच्या झाडासारख्या
जिथं परंपरेच्या नावाखाली का होईना बाई स्वातंत्र्य अनुभवते
वडाच्या झाडाला फेऱ्या मारणाऱ्या सावित्रीला दूषणं देणं सोप्पंय,
कारण ती काहीच बोलू शकत नाही,
ती अडकली आहे सत्यवानाचा जीव वाचवणाऱ्या वडाचे ऋण मानण्यात
ती जाणून आहे,
तिने नवऱ्याला जीवंत नाही केलं तर तिचं आयुष्य निरर्थक बनवलं जाईल
अरे माझ्या भीमानं आणि ज्योतिबानं हे जाणलं
म्हणून त्यांनी सोबतीनं घडवल्या
भीमाच्या लेकी आणि ज्योतिबाच्या सावित्री
वडाला फेऱ्या मारणं हे तर बायांच्या अपरिहार्य वेदनेच्या हिमनगाचं एक टोक
अशा हजारो फेऱ्या बाई रोज मारत असते आयुष्यात
चांगली बाई बनण्यासाठी
कधीतरी तिथेही डोकावून पाहाल काय
त्या वेढ्यातूनही बाईची सुटका कराल काय
वडाच्या फेरे मारणाऱ्या मलाही बनायचं आहे विद्येची सावित्री
आता आम्ही सगळ्याच बाया थकलो आहोत व्यर्थ फेऱ्या मारून,
आम्हालाही हवी आहे मुक्ती या फेऱ्यांमधून,
हा जन्म शेवटचा असावा या सत्यवानासोबतचा हीही मनोमन इच्छा
फक्त तुम्ही एवढंच कराल,
या सत्यवानांच्या गर्दीत “जोतिबांना” शोधून कधीतरी विचाराल,
“हे ज्योतिबा, कुठे आहे 'तू घडवलेली ' सावित्री?”
आणि मग मला पुसाल, “बये, तू कोंची सावित्री?”
- लक्ष्मी यादव