सोलापूर प्रतिनिधी
१५ जून दुपारी ४.०० वा.सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या ९२ मीटर अनाधिकृत को जनरेशन चिमणी चे पाडकाम पूर्ण झाले. हा तर सत्याचा असत्यावर विजय आहे.२०१४ सालापासून सोलापूरच्या होटगी रोड विमानतळास व विकासाला लागलेले ग्रहण सिद्धेश्वरांच्या कृपेने सुटले आहे .सोलापूर विचार मंचच्या गेल्या ४ वर्षाच्या अथक प्रयत्नांना यश प्राप्त झाले आहे. हा दिवस हा सोलापूरच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. १९३० मध्ये सोलापूरने जसे ४ दिवसांच्ये स्वातंत्र्य उपभोगले व पूर्ण देशभर नावलौकिक मिळवला त्याचप्रमाणे सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी सोलापूर विचार मंचच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांनी उभा केलेल्या लढ्यास प्राप्त झालेले हे यश आहे व हे प्रामाणिकपणे,चिकाटीने व अथक लढून सर्वसामान्य लोक आपले हक्क मिळवू शकतात याचे उदाहरण आहे.
सोलापूरला २००८ सालापासून बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे गाजर दाखवून फसवणूक केल्याचे जेव्हा आमच्या लक्षात आले तेव्हा आम्ही होटगी रोड विमानतळाचा अट्टाहास धरला.या अनधिकृत चिमणीच्या बाबतीत कोणत्याही लोकप्रतिनिधींनी पुढाकार किंवा पाठिंबा दिला नाहीच या उलट चुकीच्या बातम्या व अफवा पसरवल्या हे अत्यंत खेदाचे आहे.
हि को जनरेशनची चिमणी पडल्यामुळे कारखान्याच्या गाळापावर कोणताही परिणाम होणार नाही व पुढील हंगामात ५००० मेट्रिक टन गाळप हा कारखाना आपल्या पूर्वीच्या दोन चिमण्यांवर सक्षमरित्या करू शकतो. त्यामुळे या कारखान्याच्या सभासद शेतकरी व कामगारांनी निश्चिंत राहावे. परंतु आता कारखान्याची सूत्रे अत्यंत जबाबदार व्यक्तीच्या हाती सोपवल्यासच हा कारखाना भविष्यात वाचू शकेल.
धर्मराज काडादीं कडून सातत्याने दिशाभूल केली जात आहे. ही चिमणी संपूर्णतः अवैध होती म्हणून पाडण्यात आली असे सोमपाच्या आयुक्त सौ शितल तेली उगले यांनी स्पष्टपणे सांगितले आहे परंतु धर्मराज काडादी वैयक्तिक व्यक्तीद्वेषा मुळे पाडली अशा अफवा पसरवीत आहेत.२०१४ साली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने विस्तारीकरणाला मंजुरी देतानाच पर्यावरण अनुमती ( Environmental Clearance ) अनिवार्य असल्याचे , तसेच ती घेतल्याशिवाय एक विटाचे देखील बांधकाम करू नये असे दिशा निर्देश स्पष्टपणे दिलेले होते. महानगरपालिकेची बांधकाम परवानगी नसताना व डीजीसीए ने फक्त ३० मीटर चीमणीस एन ओ सी दिली असताना सुद्धा २०१७ पर्यंत चिमणीचे बांधकाम अनाधिकृतपणे पूर्ण केले. ऑगस्ट २०१८ मध्ये मा. मुख्यमंत्री व एअरपोर्ट अथॉरिटीच्या निर्देशानुसार तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले चिमणी पाडकाम करावयास गेल्यावर त्यास आडकाठी आणून पुढील ३ महिन्यात आम्ही स्वतः पाडून घेऊ असे खोटे हमीपत्र धर्मराज काडादी आणि संचालकांनी लिहून दिले. मा. उच्च न्यायालयाने २०१८ साली चिमणी ताबडतोब पाडण्यास निर्देश दिलेले होते.
२०१४ लाच महानगरपालिकेने कारखान्यास पहिली ४७८/२ ची नोटीस देऊन सदरचे बेकायदेशीर बांधकाम ७ दिवसात पाडावयास सांगितले.
सिद्धेश्वर कारखाना जवळपास ₹ २०० कोटी नुकसानीत आणला असून, आपल्या कारखान्याला ₹ १००० कोटी देणेबाकी करून ठेवली आहे. त्याचमुळे १५०० कोटी नुकसान झाल्याची अफवा पसरवली जात आहे. आज नवीनच कारखाना ५०० कोटी रुपयात उभा राहतो मग या बाकीच्या पैशांच्या आफरातफरीचे काय व त्यास कोण जबाबदार? यांना १८० चा कोन नसून सरळ रेष असते हे देखील माहीत नाही म्हणजे याच्या बुद्धीची कीव करेल तेवढी कमी आहे.
आताही जुने बॅायलर चालू करून गाळप करणे सहज शक्य असताना परत सभासदांची दिशाभूल करून २ हंगाम गाळप शक्य नाही असे वक्तव्य करीत आहेत. मागील हंगामातील ₹१८००/- टन प्रमाणे कुणाचे पैसे येणे आहेत ते त्यांनी मागुन घ्यावेत. हा कारखाना आमच्या ताब्यात दिला तर आम्ही येत्या हंगामापासून तो चालवुन दाखवू असे कारखान्याचे माजी तज्ञ संचालक व सोलापूर विचार मंचचे श्री संजय थोबडे यांनी सांगितले आहे.
भारतीय विमान प्राधिकरणाकडून उडान योजनेअंतर्गत सोलापुरातून विमान सेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. सोलापूरच्या सुसज्ज असणाऱ्या होटगी रोड विमानतळावरून येत्या तीन महिन्याच्या आत नागरी विमान सेवा सुरू होणार आहे. होटगी रोड विमानतळा शेजारील फक्त सिद्धेश्वर कारखान्याच्या ९२ मीटर अनाधिकृत को- जनरेशनच्या चिमणीचाच अडथळा असल्याने येथून नागरी विमान सेवा सुरू होत नव्हती परंतु १५ जूनला ही चिमणी जमीन दोस्त झाल्यानंतर या विमानतळाचे डीजीसीए कडून ऑपरेशनल लायसन्स मिळण्याची तयारी अत्यंत युद्ध पातळीवर सुरू आहे व येत्या तीन महिन्याच्या आत सोलापुरातून ही विमानसेवा खात्रीलायकरीत्या सुरू होईल असे सोलापूर विमानतळाचे प्रमुख श्री बानोत चॅम्पला यांनी सोलापूर विचार मंचच्या सदस्यांना होटगी रोड विमानतळाच्या भेटीदरम्यान सांगितले. होटगी रोड विमानतळावर बहुतांश सर्व सोयी उपलब्ध असून सोलापूर विमानतळाची सध्याची धावपट्टी ही २.१ किलोमीटरची असून त्यावरून ७२ आसनी आर टी आर विमाने सेवा देतील. मंचतर्फे नागरी उद्ययन मंत्रालय, डीजीसीए व एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया ला तातडीचे ईमेल करून येथून पहिल्या टप्प्यात मुंबई, दिल्ली, हैदराबाद, बेंगलोर, चेन्नई व तिरुपती अशा ठिकाणी विमान सेवा सुरू करावी अशी विनंती करण्यात आली आहे . त्यामुळे चिमणी पडली आता विमानसेवेचे काय? या प्रश्नाला सोलापूर विचार मंच द्वारे कृती करून उत्तर देण्यात आले आहे. त्यामुळे चिमणी व्यतिरिक्त अन्य १०५ अडथळे आहेत, होटगी रोड विमानतळ व त्याची धावपट्टी छोटी आहे, त्याचे विस्तारीकरण होऊ शकत नाही अशा सर्व अफवांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
आता सोलापूरची विमानसेवा दृष्टिक्षेपात आल्यामुळे समाजाच्या सर्व स्तरातून उत्साहाचे वातावरण आहे विशेष म्हणजे सोलापूरच्या उद्योजक, व्यापाऱ्यांना ही बाब अत्यंत सकारात्मक झाली आहे. त्यामुळे सोलापुरातील पूर्वीचे चादर ,टॉवेल, टेक्स्टाईल, रेडिमेड गारमेंट, शेती व इतर उद्योगांना त्याचा खूप फायदा होणार असून येथे नवीन उद्योग येऊन बाहेर विस्थापित झालेले सोलापुरातील लोक पुन्हा सोलापुरात येऊन स्थायिक होतील, येथील धार्मिक पर्यटन वाढेल, मेडिकल टुरिझम वाढेल व सोलापूर, लातूर व उस्मानाबाद येथील समाजातील सर्वच घटकांना फायदा होऊन सोलापुरातून पुन्हा एकदा सोन्याचा धूर निघेल हे आता दृष्टिक्षेपात आले आहे. हा लढा अतिशय अवघड होता. यालढ्यामध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे मदत केलेल्या सर्वांचे व मीडियाचे मनःपूर्वक सोलापूर विचार मंच तर्फे आभार.
डॉ. संदीप आडके व सर्व सदस्य.
सोलापूर विचार मंच ,सोलापूर.
९८२२८०७००७.