लेखन - नंदकुमार देशपांडे
००- आज स्मृतिदिन विशेष लेख -००
*अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष, थोर स्वातंत्र्यसेनानी, ग्राहक संरक्षण कायद्याचे जनक आदरणीय ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी उपाख्य नाना यांचा आज स्मृतिदिन.*
वेदांती योगाभ्यासी घराण्याची परंपरा असणाऱ्या *आदरणीय स्व. स्वातंत्र्यसेनानी ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी* या ग्राहक चळवळीच्या पालनकर्त्याची 10 मे 2015 रोजी प्राणज्योत मालवली.
प्राचीन ग्रंथ, वेद, उपनिषदे यांचा उत्तम अभ्यास, शुद्ध जीवन, स्वच्छ व्यवहार, निरोगी आयुष्य, एक जाणकार योगाभ्यासी म्हणूनच समाजकार्यात झोकून देणे आणि ग्राहक चळवळीचा प्रचार आणि प्रसार कार्यासाठी संपूर्ण देशभर प्रवास करणे त्यांना शक्य झाले.
यातूनच *ग्राहक चळवळीला भारतीय सिद्धांताचा वैचारिक आयाम देऊन " वन लाईफ - वन मिशन" हे जीवनसूत्र मानून त्यांनी एक देशव्यापी संघटना बांधली.*
आदरणीय नाना हे अखेरच्या श्वासापर्यंत समाजशरण वृत्तीने अखंड कार्यरत राहून *ग्राहक चळवळीचे तारणहार बनले. विशुद्ध चारित्र्य, पारदर्शी व्यवहार, समाजाप्रती असणारी आत्मीयता, माणसं जोडणं, त्यांचं संघटन उभे करणं ही त्यांची कार्य गुणवैशिष्ट्ये.*
1974 साली सुरू केलेल्या ग्राहक चळवळीचा नवा भारतीय विचार समाजासमोर मांडत *ग्राहकशक्ती + न्याय्य शक्ती म्हणजे शोषणमुक्ती हा सिद्धांत* त्यांनी साध्य केला.
देशातील राष्ट्रपती, पंतप्रधानांपासून ते सर्वच क्षेत्रातील महानुभावांच्या गाठीभेटी घेऊन चर्चा करून ग्राहक चळवळीचा हा नवा आयाम त्यांनी अंगी उतरविला.
त्यातूनच 1980 साली ग्राहकांच्या हितरक्षणासाठी म्हणून ग्राहक संरक्षण कायद्याचे प्रारूप बनवण्यात आले. सलग सहा वर्षे पाठपुरावा केल्यानंतर *24 डिसेंबर 1986 साली हा ग्राहक संरक्षण कायदा जन्मास आला आणि शोषण मुक्तीचा एक नवा सिद्धांत कार्यान्वित झाला.*
*"गाव तिथे ग्राहक पंचायत"* हे ध्येय घेऊन संपूर्ण भारताची त्यांनी परिक्रमा केली.
*1995 मध्ये महाराष्ट्र शासनात स्वतंत्र ग्राहक कल्याण मंत्रालय स्थापन करण्यात आले. या ग्राहक कल्याण उच्चाधिकार समितीच्या अध्यक्षपदावरून (कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद) प्रशासन ग्राहक चळवळीला कसे सहाय्य करू शकते, याचे संपूर्ण देशासमोर एक आदर्श मॉडेल उभारण्यात आदरणीय नाना यशस्वी झाले.*
त्याच माध्यमातून संपूर्ण जिल्ह्या- जिल्ह्यांमधून *जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ग्राहक संरक्षण कक्ष आणि स्वतंत्र न्यायदानासाठी ग्राहक तक्रार निवारण आयोगांची उभारणी करण्यात आली.*
*भारताला विश्ववंदिता करवून सुजलाम सुफलाम मलयजत शीतलाम बनवूया हाच वचननामा तंतोतंत पालन केलेल्या 85 वर्षांच्या या ग्राहक चळवळीच्या पालनकर्त्याची 10 मे 2015 रोजी प्राणज्योत मालवली.*
*85 वर्षांच्या आयुष्यामध्ये हिमालयाची उंची आणि गंगेच्या ओघाइतकी पवित्रता लाभलेल्या आदरणीय बिंदुमाधव जोशी यांच्यातील बिंदू.. बिंदूंना आज दि. १० मे 2023 रोजी ग्राहक चळवळीच्या या पालनकर्त्यांस, सर्व व्रतधारी कार्यकर्त्यांकडून भावपूर्ण आदरांजली.*