पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी जमातीला जात प्रमाणपत्र सुलभरीत्या मिळावे यासाठी धुळे जिल्हा कोळी समाजाच्या नेत्या गीतांजलीताई कोळी 24 एप्रिल पासून आमरण अन्नत्याग उपोषणाला बसलेल्या असून आज 16 दिवस झाले तरीही त्यांच्या या आंदोलनाची धुळे जिल्हा प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे याचे तीव्र पडसाद सबंध महाराष्ट्रात उमटत आहेत. महाराष्ट्रातील आदिवासी कोळी बांधवांनी याविरुध्द यल्गार पुकारला असुन आज पंढरीतही याचे तीव्र पडसाद उमटलेले आढळून आले. महर्षी वाल्मिकी संघाने याच्या निषेधार्थ धुळे प्रशासनाचा प्रतिकात्मक पुतळा बनवून तो पुतळा चंद्रभागेच्या पाण्यात 16 वेळा बुडवून आपल्या भावना शासनापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला.
यावेळी बोलताना महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव म्हणाले की, आदिवासी कोळी समाजाची एक महिला गेली 16 दिवस झाले, जात प्रमाणपत्र सुलभरीत्या मिळावे म्हणून आमरण अन्नत्याग उपोषणाला बसलेली आहे. परंतु धुळे जिल्हा प्रशासनाने त्यांच्या या आंदोलनाची दखल न घेतल्याने राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. 16 दिवस अन्न त्याग केल्यामुळे गीतांजली ताईसह उपोषणकर्त्यांची तब्येत अत्यंत खालावलेली असून कोणत्याही क्षणी त्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली असताना सुद्धा निगरगट्ट प्रशासन डोळेझाक करत आहे.
यावरुन प्रशासनाची संवेदनशीलता संपलेली दिसून येतेय. अशा या असंवेदनशील प्रशासनाचा निषेध म्हणून धुळे जिल्हा प्रशासनाचा प्रतीकात्मक पुतळा तयार करून सोळा वेळा पंढरपूरच्या चंद्रभागा नदीमध्ये बुडवून प्रशासनाचा तीव्र निषेध करण्यात आला. आत्ता तरी प्रशासनाने याकडे गांभिर्याने लक्ष घालून त्वरित दखल घ्यावी, गीतांजली ताईला वाचवावे अन्यथा महाराष्ट्रामध्य त्याचे तीव्र पडसाद उमटतील आणि जी परिस्थिती निर्माण होईल त्या परिस्थितीला धुळे जिल्हा प्रशासन जबाबदार राहील असही त्यांनी सांगितले.
यावेळी महर्षी वाल्मिकी संघासह महादेव कोळी समाजाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.