ईगतपुरी तालुका प्रतिनिधी- नवनाथ गायकर
- महाराष्ट्रातील शिवसेना व भाजपच्या युती सरकारने एस.टी. सेवेत अनेकानेक सवलती जाहिर केलेल्या आहेत. या सवलतीचां फायदा आदिवासी बहुल अतिदुर्गम भागातील प्रवाशानां होणे गरजेचे आहे. मात्र ईगतपुरी आगाराकडुन आदिवासी बहुल अतिदुर्गम भागातील एस.टी.फेर्याच बंद असल्याने हे नागरिक या लाभापासुन वंचितच रहात आहे. याची दखल घेऊन ईगतपुरी आगाराने तालुक्यातील एस टी फेर्याचे योग्य सु व्यवस्थापन करावे व शासनाच्या सवलतीचा थेट लाभ तळागाळात पोहचवावा अशी मागणी आहुर्लीचे माजी चेअरमन तथा सामाजीक कार्यकर्ते नवनाथ अर्जुन पा गायकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केली आहे.
ईगतपुरी तालुक्यातील कुशेगाव, मोडाळे व शिरसाटे ही आदिवासी बहुल अतिदुर्गम अशी गावे आहेत. या गावांमध्ये पुर्वी ईगतपुरी आगाराची बसफेरी सुरु होती.मात्र आगारा तील अनागोंदी कारभाराच्या पाश्र्वभूमीवर सदरची बसफेरी बंद झालेली आहे. यामुळे येथील जेष्ठ नागरिक, महिला व शालेय विदयार्थी आदि सर्वच घटक या सवलतीपासुन वंचित रहात आहे. सदरची फेरी पुर्ववत सुरु करावी अन्यथा ठिय्या आंदोलन केले जाईल असा ईशारा गायकर यांनी दिला आहे.
याच प्रमाणे कर्होळे , रायांबे, वाळविहिर आदिसारखी कितीतरी आदिवासी अतिदुर्गम गावे आहेत जी या सवलती पासुन वंचित रहात आहे.आणि या गावांमध्ये बसेसच जात नाहीत.
आहुर्ली-सांजेगाव मार्गे नाशिक हा एक महत्त्वाचा मध्यम मार्ग आहे.मात्र या मार्गे नाशिक शहराला जाणेसाठी चक्क एकही बस नाही. प्रत्यक्षात या मार्गावरुन मोठया प्रमाणात कामगार, शालेय विदयार्थी प्रवास करत असतात. मात्र बसेसची सुविधा नसल्याने नागरिकानां नाईलाजाने खाजगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागतो.मग शासनाच्या सवलतीचा उपयोग तरी काय ? या अनागोंदी कारभारामुळे खरे लाभार्थी वंचितच रहात असल्याचा आरोप गायकर यांनी केला आहे.