आपत्ती समोर सर्व समान आहेत. हे कोरोनापासूनही आपण शिकलो नाही याची खंत वाटते. एखादी दुर्घटना घडली की एकमेकांवर ताशेरे ओढण्याची चढाओढ सुरू होते. सर्व माध्यमातून दुर्घटनेचे बारावे घातले की परिस्थिती पुन्हा जैसे थे.
संघटन राजकीय असो वा धार्मिक केवळ अनुयायी तयार केले जातात. प्रभावी नेतृत्व निर्माण केले जात नाही . खरतर आपल चुकतय कुठे? या प्रश्नाचे सभा मेळाव्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाने आत्मपरिक्षण केले पाहिजे. नियोजना मध्ये प्रमुख भूमिका ही स्थानिक राजकारणी , महानगरपालिका, अग्निशमन दल, पोलीस दल यांचीच असते. बळी तो काळ पिळी या म्हणीनुसार संबंधित वरिष्ठ अधिकारी आपल्या अधिकाराचा वैयक्तिक स्वार्थासाठी दुरूपयोग करतात. त्यावेळी कनिष्ठांना नाईलाजाने आदेशाचे पालन करावे लागते. हे कित्येक घटनां मध्ये निदर्शनास आलेले आहे.
सभा मेळाव्यासाठी उपस्थित राहणाऱ्यांनी स्वयंशिस्त पाळणे अतिशय महत्त्वाचे असते. शक्तीप्रदर्शनासाठी कोणी आपला उपयोग करून घेऊ नये याची काळजी घ्यावी. आपल्या सोबत दुर्घटना घडू नये म्हणून कार्यक्रमाचे ठिकाण , स्वरूप, उपस्थितांची संख्या, सेवा सुविधा यांची आगाऊ माहिती करून घ्यावी. सभेला उपस्थित राहणे अत्यावश्यक आहे का? आपले आरोग्य , सुरक्षा याबद्दल आपण सतर्क रहावे. सुरक्षे संदर्भात प्रथमोपचाराची आवश्यक साधनसामुग्री स्वतः सोबत ठेवावी.कारण आपत्ती ही नेहमी सक्रिय असते.
श्रध्दा आणि एकनिष्ठेचे प्रदर्शन करण्यासाठी जोशात बहुसंख्येने सहभागी होताना वैयक्तिक सुरक्षिततेचे भान ठेवणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी नाही का? धार्मिक जत्रा, सभा मेळावे यासाठी वेळ देणारे आपत्कालिन व्यवस्थापन, अग्निप्रतिबंधक प्रशिक्षण यासारख्या मोफत सरकारी उपक्रमात सहभागी होताना मात्र उदासिनता दाखवितात. कित्येकवेळा त्यांच्या सुरक्षिततेसाठी तैनात यंत्रणेतील व्यक्तींने नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्यास अरेरावी करताना दिसतात. सभा मेळाव्यात सहभागी होताना प्रथमोपचार साहित्य सोबत ठेवणे दूरची गोष्ट परंतू आपत्कालिन परिस्थिती उदभवल्यास स्वतःचे नाव,पत्ता , रक्तगट, विशिष्ट व्याधी संदर्भातील माहिती, त्वरित प्रतिसाद देणाऱ्या नातेवाईकांचा संपर्क क्रमांक असे वैयक्तिक ओळखपत्र सोबत ठेवण्याची दक्षता घेत नाहीत .
सभा मेळाव्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र देणाऱ्या प्रशासकीय यंत्रणा, प्रत्यक्ष उपस्थित राहणारे अधिकारी यांनी सुरक्षे संदर्भात नियमांचे पालन केले आहे की नाही याची शहानिशा करावी. आयोजकांनी आमंत्रित केलेल्या व्यक्तींना खबरदारीच्या सूचना देणे याचा अभाव दिसतो. केवळ महसूल आणि प्रमोशनच्या हव्यासामुळे नाहक बळी जातात. आणि सर्वसामान्य जनतेच्या माथी दंड लादला जातो.
भारताचा लोकसंख्ये मध्ये प्रथम क्रमांक येतो. मात्र आपत्कालिन परिस्थितीत सेवा सुरक्षा पुरविणा-यांचे प्रमाण व्यस्त आहे. खरोखरच संबंधितांच्या भावना बोथट झाल्या नसतील तर प्रत्येक नागरिकाला आपत्कालिन व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेणे अनिवार्य करावे. उत्स्फुर्तपणे प्रशिक्षित स्वयंसेवक निर्माण करण्याची जबाबदारी विविध संघटनांनी घेणे हा ख-या अर्थाने "मेक इन इंडिया" करण्याचा रामबाण उपाय आहे.
आपली नम्र,
सुरक्षा शशांक घोसाळकर
पवई,मुंबई