पंढरपूर प्रतिनिधी
साखर कारखान्याचे गळीत हंगाम बंद झाले आहे. साखर विक्री आणी बँक कर्जातून निधी उपलब्ध करण्यासाठी आमचे अटोकाट प्रयत्न सुरु असताना तथागथीत राजकीय विरोधकांकडून संस्थेबददल अपप्रचार करुन निधी उपलब्धतेमध्ये अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तरीही शेतकरी, कामगार व वाहतुकदारांची उर्वरीत देणी देण्यासाठी बांधील असल्याचा पुनरोच्चार सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याण काळे यांनी केला.
कारखान्याची निवडणुक प्रक्रिया सुरु असल्याने विरोधक सभासदांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करु पाहत आहेत. मागील साडेचार वर्षात शेतकऱ्यांचे ऊस गाळप, कारखान्याचे हित, सभासदांच्या ऊस तोडणीस येणाऱ्या अडचणी याबाबत विरोधकांनी कधी चकार शब्द सुध्दा काढले नाहीत. उलट यापुर्वीही वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध करुन घेताना त्यासंस्थांना चुकीची माहिती देवून अर्थ सहाय्य मिळविण्यासाठी जाणीव पुर्वक अडथळे निर्माण करण्यात आले होते असा आरोप काळे यांनी केला. कारखान्याच्या गेट समोर यापुर्वी कधीही कामगारांनी आंदोलने केली नाहीत. उलट संस्थेच्या अडचणीच्या काळात सर्व कामगारांनी संस्थेस चांगले सहकार्य केलेले आहे. मात्र जाणीव पुर्वक माझ्याच गावातील एखाद्या कामगारास चिथावणी देवून त्याला आंदोलनात उतरविले जात असेल तर त्यामागचा बोलविता धनी कोणी आहे हे ओळखणे इतपत सभासद अडाणी नाहीत. आंदोलनस्थळी सभासद व कामगारांची उपस्थिती नगन्न होती. सुज्ञ सभासद विरोधकांच्या जुमल्यास थारा देणार नाहीत असा विश्वास काळे यांनी व्यक्त केला.
निवडणुकीची आपणास कधीही भिती वाटत नाही यापुर्वीही कारखान्याच्या निवडणुका झाल्या आहेत. त्यामध्ये सभासदांनी दिलेला कौल जनतेसमोर आहे. मात्र निवडणुकीच्या निमित्ताने संस्थेची बदनामी होत आहे ही संस्थेच्या हितास बाधा आणणारे आहे अशी खंत काळे यांनी व्यक्त केली. यापुर्वी विरोधकांकडून संस्थेच्या बदनामीचे प्रकार झाले होते त्याचा परिणाम सर्वश्रृत आहेच, विरोधकांचा विरोध माझ्याशी असावा संस्थेशी नको अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.