पंढरपूर प्रतिनिधी
“व्यवसाय असो की नोकरी ते करण्यासाठी विद्यार्थ्यांनी कौशल्ये आत्मसात केली पाहिजेत. कौशल्यपूर्ण व्यवसायाने प्रगती करता येते. नेतृत्त्व गुण, प्रामाणिकपणा, निस्वार्थीपणा, सहकाऱ्यांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती, स्वयंशिस्त, तीव्र भावना, सकारात्मक दृष्टीकोन,संगणकाचे अद्ययावत ज्ञान, ही कौशल्ये विद्यार्थ्यांनी अंगीकारणे आवश्यक आहे. नेतृत्त्व गुणांचा विकास केला तर नोकरी आणि व्यवसायात यशस्वी होता येते. ” असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. मधुसूदन बचुटे यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात एक मार्च ते सहा मार्च या कालावधीत पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यासाठी ‘विद्यार्थी प्रशिक्षण आणि व्यवस्थापकीय विकास कार्यक्रमा’चे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे हे होते.
प्राचार्य डॉ. मधुसूदन बचुटे पुढे म्हणाले की, “महाराष्ट्रातील विद्यार्थी प्रशासकीय सेवेत अधिकाधिक भरती व्हावेत.यासाठी विविध उपाययोजना आखत आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्पर्धा परीक्षेचे स्वरूप बदलेले आहे. तरी या बदलाचा विद्यार्थ्यांनी अभ्यास करून परीक्षेची तयारी करावी. मोबाईल माध्यमाच्या आहारी जाण्याऐवजी त्याचा योग्य तो वापर करून स्वत:चा बौद्धिक, मानसिक व शैक्षणिक विकास करावा.”
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे म्हणाले की, “समाजात विविध प्रकारच्या नोकऱ्या आहेत. त्यांची संधी विद्यार्थ्यांना मिळू शकते. मात्र त्यासाठी आवश्यक असणारे कौशल्ये विद्यार्थ्यांनी आत्मसात करणे आवश्यक आहे. सध्याचे विद्यार्थी हे ज्ञानाधिष्ठित बनण्या ऐवजी परीक्षा केंद्रित बनले आहेत. त्यामुळे कौशल्यापेक्षा ते मार्कांना अधिक प्राधान्य देताना दिसत आहेत. कौशल्या शिवाय मिळविलेले गुण हे तकलादू असू शकतात. म्हणून विद्यार्थ्यांनी कौशल्यपूर्ण ज्ञानाला प्राधान्य देणे आवश्यक आहे.”
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. बालाजी लोंढे यांनी केले. तर प्रमुख पाहुण्याचा परिचय प्रा. धनंजय वाघदरे यांनी करून दिला. या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. चांगदेव कांबळे, उपप्राचार्य डॉ. बजरंग शितोळे, अधिष्ठाता डॉ. अनिल चोपडे, सर्व विभागाचे विभाग प्रमुख,पदव्युत्तर विभागातील शिक्षक, विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कुबेर गायकवाड यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. प्रशांत नलवडे यांनी मानले.