तुळजापूर प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील जवाहर नवोदय विद्यालयात ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, कविवर्य कुसुमाग्रज उर्फ तात्या यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम विद्यालयाचे प्राचार्य गंगाराम सिंह व मराठी अध्यापिका विद्या जाधव यांनी प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहिली. यावेळी विद्यालयातील सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षकेतर कर्मचारी , शिक्षक वृंद उपस्थित होता.
या मराठी दिनाचे औचित्य साधून संगीत अध्यापक पी .एन .जोशी व सहकारी यांनी गीतकार सुरेश भट यांचे लाभले भाग्य आम्हास बोलतो मराठी !जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी!! हे गीत गायन करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून वर्ग सहावीतील मराठी भाषेचे महत्व या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
प्राचार्य गंगाराम सिंह यांनी मराठी भाषेची थोरवी गात असताना म्हणाले की ,मराठी भाषा अमृता सारखी गोड आहे. ती जास्तीत जास्त ग्रहण करून आपल्या मातृभाषेवर प्रभुत्व मिळवावे . आपली मातृभाषा जेवढी चांगली येईल तेवढ्या अनेक भाषा शिकण्यास सोप्या जातात. हे सांगून मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रजांचे स्थान किती महत्त्वपूर्ण आहे .यावर आपले विचार व्यक्त करून सर्वांना आज मराठी राजभाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एच जी जाधव यांनी केले.