मुंबई प्रतिनिधी - गणेश हिरवे
येथील ज्येष्ठ नागरिक संघ नेरुळ यांच्या विद्यमाने, संघाच्या श्री गणेश सभागृहात दिनांक ९.०२.२३ रोजी, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती नेरुळ शाखेचे प्रमुख कार्यवाह रमेश साळुंखे यांनी चमत्कारामागील विज्ञान हा कार्यक्रम अनेक सप्रमाण उदाहरणे देऊन सादर केला. या कार्यक्रमात अंधश्रद्धा निर्मूलन वार्ता पत्राचे राजीव देशपांडे हेही सहभागी झाले होते. प्रसंगी पांडुरंग क्षेत्रमाडे, संघाचे अध्यक्ष अरविंद वाळवेकर, पदाधिकारी दीपक दिघे, अजय माढेकर, प्रभाकर गुमास्ते, रणजीत दीक्षित, नंदलाल बॅनर्जी, श्रीमती सीमा आगवणे, सुचित्रा कुंचमवार, विजय सावंत, दत्ताराम आंब्रे, विकास साठे आदी मान्यवर तसेच जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे उपस्थित होते.
राजीव देशपांडे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की अंधश्रद्धा निर्मूलनाला विवेकवादी समाजाची निर्मिती करावयाची आहे. विज्ञान, निर्भयता आणि नीती ही अंधश्रद्धा निर्मूलनाची ब्रीदवाक्ये आहेत. संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, ही मूल्ये आणि वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात रुजवावा आणि शोषणमुक्त समाज निर्माण व्हावा हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुख्य उद्दिष्ट आहे हे त्यांनी स्पष्ट केले.
उपस्थितांशी संवाद साधताना रमेश साळुंखे यांनी सांगितले की, घटनेच्या चौकटीतच धर्माची चिकित्सा अंधश्रद्धा निर्मूलन करते. धर्म हा समाजाच्या उन्नतीसाठी आहे. परंतु त्यातल्या वाईट रीती, परंपरा या समाजाला पोषक नसतात. उदाहरणार्थ देवदासी प्रथा, जटा प्रथा अशा प्रकारच्या गोष्टींचं निर्मूलन झालं पाहिजे. आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे, असं सांगून ते पुढे म्हणाले की, अंधश्रद्धा सर्व जाती धर्मात आहेत. त्यांचही निर्मूलन होऊन समाजाचे प्रबोधन झालं पाहिजे. बुवा महाराज जे काही चमत्कार करतात त्यामधली हात चलाकी तसेच त्यामध्ये असणारं विज्ञान प्रात्यक्षिकाद्वारे त्यांनी उपस्थितांमधील व्यक्तींना सहभागी करून घेऊन स्पष्ट केले. श्रद्धा ही डोळस असावी असे त्यांनी आग्रहाने प्रतिपादित केले.
शेवटी संस्थेची कोषाध्यक्ष विकास साठे यांनी उपस्थित श्रोत्यांचे व पाहुण्यांचे यथोचित आभार मानले. रमेश गायकवाड यांनी म्हटलेल्या राष्ट्रगीताने कार्यक्रमाचे समापन झाले.