पंढरपूर प्रतिनिधी
“निसर्गाला हानी न पोहचविता केलेला विकास हा शाश्वत विकास होय. दोन औद्योगिक क्रांतीने निसर्गाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास केला आहे.
शेतीच्या विकासासाठी वापरण्यात येणारी रासायनिक खते आणि औषधे यांच्या वापराने कॅन्सर सारख्या आजाराला निमंत्रण दिले गेले. शाश्वत विकास ही संकल्पना नीटपणे समजून घेतली तर शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणणे शक्य होईल. विशेषिकरणाच्या नावाखाली निर्माण करण्यात आलेले कप्पे दूर करून एकत्रित शिक्षणाची कास धरणे आवश्यक आहे.” असे प्रतिपादन बिजापूर लिबरल डेव्हलपमेंट एज्युकेशन विद्यापीठाचे कुलगुरू तथा प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे माजी कुलगुरू डॉ. वाय.एम. जयराज यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने रुसा कॉम्पोनंट ८ अंतर्गत ‘मायक्रो बेस फॉर सस्टेनेबल अग्रीकल्चर,अनिमल हजबंड्री अॅड एनवॉरर्मेट’ या विषयावर ’आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष उच्च शिक्षण विभागीय सहसंचालक डॉ. यु. बी. काकडे, इस्टर्न विद्यापीठ श्रीलंका येथील वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख श्रीमती डॉ. चंद्रकांता महेंद्रनाथन, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. एन.एम. जगताप, उपप्राचार्य डॉ. चांगदेव कांबळे, उपप्राचार्य डॉ. बजरंग शितोळे, उपप्राचार्य अप्पासाहेब पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
माजी कुलगुरू डॉ. वाय. एम. जयराज पुढे म्हणाले की,“शिक्षणातून नवनिर्मिती झाली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या मधील टॅलेन्ट विकसित झाले पाहिजे. पाश्चात्यांच्या अनुकरणातून आपण अनेक चुकीच्या बाबी स्वीकारल्या आहेत. पेहराव आणि खाद्यपदार्थ यामधील अनुकरण टाळले पाहिजे.
भारतीय सण आणि उत्सव हे बदलत्या ऋतुमानानुसार तयार करण्यात आले असून त्यातील खाद्यपदार्थ आपणास निसर्गाशी लढण्याचे बळ देतात. भारतीय हवामानानुसार तयार करण्यात आलेले अन्न सेवन केल्यास आजाराचा कोणताही धोका
होत नाही. ”
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी केले. या कार्यक्रमास शास्त्रविभागाचे अधिष्ठाता डॉ. अनिल चोपडे, निमंत्रक डॉ. नवनाथ पिसे, समन्वयक डॉ. अमर कांबळे, व्यवस्थापकीय सेक्रेटरी डॉ. अमोल ममलय्या तसेच देशातील इोको फ्रेंडली आणि देशाबाहेरील अनेक संशोधक, अभ्यासक, प्राध्यापक, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. नेहा देसाई यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार डॉ. एस. व्ही. थिटे यांनी मानले.