सोलापूर प्रतिनिधी
येत्या दहा तारखेला मुंबई ते सोलापूर दरम्यान धावणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेस बद्दल व सोलापूर स्थानकाबद्दल सोलापूर विचार मंच तर्फे डॉ.संदीप आडके यांनी आज तातडीने केंद्रीय रेल्वेमंत्री मा.आश्विनी वैष्णव व श्री रावसाहेब दानवे तसेच सेंट्रल रेल्वे प्रशासनास ई-मेल पाठवून काही विनंती केलेल्या आहेत. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या असणाऱ्या सोलापूर डिव्हिजन मधून ही पहिली वंदे भारत एक्सप्रेस सुरू होत असल्यामुळे सोलापूर ते मुंबई प्रवासासाठी सोलापूरच्या प्रशिक्षित ड्रायव्हरना सोलापूर स्टेशन वरून ही गाडी नेण्याचा मान द्यावा.
तसेच या एक्सप्रेसच्या वेळा सोयीस्कर ठेवून मुंबईमध्ये जास्त वेळ मिळावा व रात्री 11 पर्यंत ही गाडी परत सोलापुरात यावी तसेच त्याचे तिकीट दर हे विमाना पेक्षाही जास्त असल्याने ते सर्वसामान्यांना परवडण्यासारखे करावे जेणेकरून या गाडीला प्रतिसाद सुद्धा उत्तम मिळेल.सोलापूरच्या पूर्वी असलेल्या मालधक्याच्या जागेत एक नवीन रेल्वे टर्मिनस तयार करून तेथे तीन नवीन प्लॅटफॉर्मचे उभारणी करावी म्हणजे रेल्वे स्थानकावरील गाड्यांची सोय होईल.
फार दिवसापासून सोलापूरची प्रलंबित मागणी असणाऱ्या सोलापूर ते गोवा व सोलापूर ते नागपूर दोन नवीन एक्सप्रेस ट्रेन चालू कराव्यात. मुंबई ते हैदराबाद अशी वंदे भारत सेवा सुरू करण्यासाठी सोलापूर विचार मंच तर्फे रेल्वे विभागास निवेदनं देण्यात आली होती व त्या अनुषंगाने पहिली सेवा सुरू झाल्याबद्दल सोलापूर विचार मंच तर्फे रेल्वे मंत्रालय व प्रशासनाचे आभार देखील मानण्यात आले आहेत असे डॉ. संदीप आडके यांनी सांगितले आहे.