पंढरपूर प्रतिनिधी
“मराठी भाषा ही पुरातन काळापासून अस्तित्त्वात असल्याचे अनेक पुरावे समोर येत आहेत. संस्कृत भाषेच्या समांतर ही भाषा व्यवहारात होती असे अनेक संशोधक मान्य करू लागले आहेत. मराठी भाषा ही देशपातळीवरील चौथ्या क्रमांकांची भाषा असून जगात असणाऱ्या साडे सहा हजार भाषेत मराठी भाषेचा तेरावा क्रमांक लागतो. मराठी भाषेच्या शंभरहून अधिक बोली व्यवहारात बोलल्या जातात. मराठी भाषा समृद्ध करण्यात संत आणि साहित्यिकाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली आहे. विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्त्व विकासासाठी परकीय भाषेच्या मागे धावण्यापेक्षा मराठी भाषेचे ज्ञान अवगत केल्यास व्यक्तिमत्त्वाचा संपूर्ण विकास नक्की होईल ” असे प्रतिपादन प्रा. विजय शिंदे यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने आयोजित कवी कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्ताने ‘मराठी भाषा गौरव दिन’ समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे हे होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मराठीतील ज्ञानपीठ पारितोषिक प्राप्त साहित्यिकांच्या पोस्टरचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कर्मवीर भाऊराव पाटील, रयतमाउली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील व कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अपर्ण करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. रमेश शिंदे यांनी केले.
प्रा. विजय शिंदे पुढे म्हणाले की, “सध्याची मराठी भाषेची स्थिती अतिशय चांगली आहे. शाळा महाविद्यालयातून ती अध्ययन अध्यापनात वापरली जाते. अनेक शासकीय आणि प्रशासकीय कार्यालयातून तिचा वापर केला जातो. अनेक लोक सिनेमागृहात जाऊन मराठी चित्रपट पाहतात. मराठी भाषेत प्रत्येक वर्षी हजारो पुस्तके प्रकाशित केली जातात. लाखो पुस्तकांची खरेदी विक्री होते. मराठीतून कार्यक्रम प्रसारित करणारे पंचवीस पेक्षा अधिक वाहिन्या आहेत. मराठी केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून ती सातासमुद्रापार पोहचली आहे. मराठी बोली भाषेतील शब्द आपण वापरले पाहिजेत. विद्यार्थ्यांनी मराठी लोकगीते, म्हणी, वाक्प्रचार, शिव्या, यांचे संकलन आणि अभ्यास केला पाहिजे.”
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे म्हणाले की, “मनात साठलेले दु:ख हुंदक्याच्या रूपाने प्रकटत असते.बहिणाबाई सारख्या कवयित्रीने अभिजात कवितांची निर्मिती केली आहे. शिक्षकांची कविता ही खडू आणि फळ्याच्या स्वरुपात प्रकट होत असते. मंदिरातील मूर्तीमधून भक्ती अभिप्रेत होत असते. तर मादिरालयातून नशा प्रकटत असते. विद्यार्थ्यांनी साहित्याच्या माध्यमातून ज्ञान आणि माहिती जमवून त्याचा स्वत:च्या जीवनासाठी उपयोग करावा. ग्रंथालयातील पुस्तके वाचावीत. वर्षातील सर्वच दिवस महत्त्वाचे असतात. म्हणून त्या दिवसाचे औचित्य साधणे आवश्यक असते.”
या कार्यक्रमात मराठी विभाग प्रमुख प्रो. डॉ. चांगदेव कांबळे यांनीही आपले मौलिक विचार व्यक्त केले. या कार्यक्रमास इतिहास विभाग प्रमुख डॉ. हनुमंत लोंढे, हिंदी विभाग प्रमुख प्रो. डॉ. फैमिदा विजापुरे, श्री. सीताराम सावंत. प्रा. डॉ. राजाराम राठोड, प्रा. डॉ. म्हाळाप्पा कांबळे, बहुसंख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रा. डॉ. दत्तात्रय डांगे यांनी मानले.