भूतकाळाकडून काही तरी शिकाव , भविष्यकाळात माझा गाव , माझं कुटुंब कसे असेल ह्या वर्तमान काळातील स्वप्नाला पुढे घेऊन जाणारी युवकांची फळी निर्माण होऊन त्यांना साथ द्यायला आईच्या काळजाची जुनी जाणती मानसे जेव्हा पुढे येतील तेव्हाचं माझ्या गावोगावचा कायापालट होईल. गावोगावची दशा आणि दिशा हीच खरी उज्वल भविष्यासाठी महत्वपूर्ण बाब आहे.आप आपल्या गावचा इतिहास व भविष्यकाळाचा विचार करून योग्य अशी वर्तमान काळात सांगड घालून सकारात्मक विचार विनिमयाची चळवळ उभी राहणे गरजेचे आहे.
नको ते विषय घेऊन चार टवाळ पोरं हाताशी धरून आंदोलन केले व बातमी झाली की आपले काम संपले असे नाही.निवडणुका आल्या की, चार टगे हाताशी धरून थाटली व बाटली दिली की आपली सेवा ओके. अशी समज करून घेणाऱ्या लोकांना खड्यागत वेचून टाकलेलं आताच बरं . नाही तर असे नारद आतल्या व बाहेरच्या लोकांमध्ये भांडण लावून आपला मलिदा अलगद खावून,ढेकर देऊन बिनधास्त मजा पाहत असतात.
खरंच गावोगावची दशा आणि दिशा बदलायचीच असेल तर ठाम निर्णयापर्यंत पोहण्यासाठी मलिदा गॅंग पासून दूर राहणे गरजेचे आहे.निवडूक काळात थाटली आणि बाटली देऊन नंतर यांची बुद्धी आटली तर सामान्य लोकांची फाटली जाते.
खरंच गावोगावची दशा आणि दिशा बदलायचीच असेल तर दिशाभूल न करणारी मानसं निवडणूक काळात निवडणूक देणे गरजेचे आहे.भावकी,रावकी,पावण पै ,आपला तुपला न पाहता कामाचा माणूस निवडणूक देणे गरजेचे आहे. अशीच मानसं गावाला दिशा देण्याचे काम करतील असे वाटते.
कुटुंब विकासात युवा वर्ग आपल्या घरातील संपत्ती असते.तसेच गावातील युवक वर्ग हा सुद्धा गावाची व देशाची भवितव्य घडविणारी पीढी आहे.त्याच्यापुढे आदर्श निर्माण करणारी गावकी व भावकी असेल तर गावाची लायकी वाढेल.
अंधश्रद्धा निर्मूलन, बुवाबाजी,भूत-केत, देवधर्म,जाती पाती, कर्मकांड, व्यसनाधीनता, खुनशी वृत्ती, धार्मिक तेढ, द्वेष भावना निर्माण करून पोट भरू खिसेकापू भूताटकी की पासून सावध राहणे गरजेचे आहे.
पुढील भाग आता वाचलाच पाहिजे...
गावचे बजेट----
गावची दशा आणि दिशा बदलायची असेल तर ग्रामपंचायतीमध्ये जाणारे सरपंच, सदस्य, गावातील पुढारी, कार्यकर्ते यांना गावचे बजेट समझने गरजेचे आहे.
शिक्षण, आरोग्य,महिला कल्याण, पाणी पुरवठा, स्वच्छता, क्रीडा या विभागावर ग्रामपंचायतीने जास्तीत जास्त खर्च करणे अपेक्षित असते.
जसे की एका गावाकरता केंद्र सरकार, राज्य सरकारच्या आणि इतर अशा जवळपास 1140 योजना असतात. जिल्हा व भौगोलिक क्षेत्र यांचा विचार करून त्या योजना ठरवल्या जातात. या योजना राज्याच्या असतील तर 100 टक्के निधी राज्य सरकार देते आणि केंद्राच्या बहुतांश योजना 60 टक्के केंद्र सरकार आणि 40 टक्के राज्य सरकार देत असते.
*साधारणतः 15 व्या वित्त आयोगा अंतर्गत सरकार गावातील प्रति माणशी, प्रतिवर्षी सरकार 957 रुपये खर्च करत असते तर 14व्या वित्त आयोगानुसार प्रति माणशी,प्रति वर्षी 488 रुपये खर्च करत असते.तो खर्च प्रत्येक प्रति माणशी झालेला आहे का ? किंवा नाही याच्यासाठी आपण बोलते व्हावे..!*
चौदाव्या वित्त आयोगाचा पैसा हा 25% मानव विकास, 25 टक्के कौशल्य विकास,25 टक्के केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा समन्वय आणि 25% पायाभूत सुविधांसाठी खर्च करणे आवश्यक होते. तो पैसा कसा व कोठे खर्च झाला ते विचारायला बोलते व्हा...! मग कळेल खरा गावचा वाली कोण आहे.
15 व्या वित्त आयोग अंतर्गत गावाला मिळालेल्या एकूण निधीपैकी 50 टक्के निधी पाणीपुरवठा, स्वच्छता आदी बाबीवर खर्च करण्यास सांगितले होते. तर उर्वरित 50 टक्के इतर बाबीवर खर्च करावयाचे होते. त्यामुळे गावाला स्वच्छ पाणी मिळाले का ? गाव स्वच्छ झाला का..? याबाबत विचारणा करून गावातील पुढाऱ्यांना बोलते करणे गरजेचे आहे. एकदा विचारून बघाच उत्तर काय मिळते...? वाट पाहतोय.. म्हणून तेथून निघून जा...?
गावातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत व वाडी वस्तीपर्यंत तो निधी पोहोचला की नाही ..? तसेच गावातील प्रत्येक वस्तीवर ग्रामपंचायतीचा विकास निधी पोहचला का ! असा प्रश्न गाव पुढाऱ्यांना ग्रामसभेत विचारुन पहा. आपली मुस्कटदाबी होत असेल तर समजावे.कागदांची रंगरंगोटी करून काही विकासपुरुषांनी आपले स्वतःचेच खिसे भरून घेतले आहेत. यासाठी बोलते होणे व बोलते करणे गरजेचे आहे.
आपल्या ग्राम पंचायतीला लोकसंख्येच्या प्रमाणात मिळालेला 14 व्या व 15 व्या वित्त आयोगातील निधी खरंच किती टक्के खर्च झाला व कुठे झाला. हे विचारण्यासाठी बोलते व्हा..!
सरपंच ,ग्रामपंचायत सदस्य व इतर सरकारी सक्षम यंत्रणांनी स्वतःचे खिशे भरण्याच्या व टक्केवारी मिळावी यासाठी भांडण करून तो निधी शासनाला परत केलेला आहे का..? हे पाहण्यासाठी बोलते व्हा.
हा विकास निधी परत गेला असेल,योग्य ठिकाणी खर्च करता आला नसेल तर समजावे आपली सरपंच निवड, ग्रामपंचायत सदस्य निवड, चुकीची ठरली आहे. असे आकार्यक्षम लोक निवडून देणे योग्य आहे का..? याबद्दल बोलते व्हा..!
तसेच गावोगावची दशा आणि दिशा बदलायची असेल तर गावात चांगले शिक्षण, आरोग्य ,स्त्रियांचा मानसन्मान स्वच्छपाणी, दिवाबत्तीचे सोय, स्वच्छता , चांगले रस्ते, ग्रामपंचायतीची मिळकत क्षेत्रे, ग्रामपंचायत जागेवर अतिक्रमणे कोणी कोणी केली आहेत. गावचा कर कोणी बुडविला आहे.याची यादी जाहीर करण्याची धमक, ग्रामपंचायत विकास कामांची तात्काळ माहिती पुरवली जाते का. की लपवली जाते हे पाहण्यासाठी युवा नेते व जुने जाणते नेते पुढाकार घेतात का..? पाहणे गरजेचे आहे. त्यासाठी बोलते व्हा.....
क्रमशः......
प्रा.आनंदा आलदर