देशाचे भवितव्य उज्वल करायचे असेल तर भारतीय संविधान अभ्यासावेच लागेल - संविधान प्रचारक प्रा.सुभाष वारे
पंढरपूर प्रतिनिधी
‘संत नामदेवांनी १२ व्या शतकात सामाजिक चळवळ सुरू केली, पुढे त्यात १८ पगड जातीतील संतांना गोळा करून वारकरी संप्रदाय सुरू झाला. जातीपातीच्या भेदभावातून मुक्ती साधण्यासाठी वारकरी संप्रदाय पुढे आला. स्वातंत्र्यपूर्व काळात देशाचे नेतृत्व जेंव्हा महात्मा गांधींकडे आले तेंव्हा स्वातंत्र्याची चळवळ ही जनतेच्या सोबत लोक संवाद साधत पुढे जाऊ लागली. देशाची लूट करणाऱ्या इंग्रजांना हाकलून देण्यासाठी म. गांधीजींच्या माध्यमातून जनतेबरोबर महत्त्वाचा संवाद सुरू झाला. इंग्रज गेल्यानंतरचा भारत कसा असेल? यावर चर्चा होत राहिली. गांधीजींच्या काळात त्यांच्या कार्यातून चळवळीची दिशा आखली गेली आणि सामान्य जनता स्वातंत्र्य लढ्यात उतरली. देशाच्या स्वातंत्र्यामध्ये अनेक महान देशभक्तांचे योगदान आहे. त्यांचे स्वप्न असणारा उज्ज्वल भारत निर्माण करणे संविधानातून शक्य असल्याने आज ‘भारतीय संविधाना’वर चर्चा करणे अत्यावश्यक आहे. भारताची राज्यघटना ही १९२० ते १९४७ पर्यंतच्या जनतेसोबतच्या संवादातून घडत गेली. त्या काळी महिलांना विविध क्षेत्रात संधी दिली जात नव्हती. समाजात आजही वंचित घटक असणार्या शेतकरी, आदिवासी, कामगार, महिला यांचा जेंव्हा विकास होईल तेंव्हा उद्याचा भारत आणखी दोन पाऊल पुढे असेल. देशाचे भवितव्य उज्वल करायचे असेल तर भारतीय संविधान हे अभ्यासावेच लागेल.’ असे प्रतिपादन राष्ट्रसेवा दलाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष व संविधान प्रचारक प्रा.सुभाष वारे यांनी केले.
स्वेरीमध्ये भारताचा अमृत महोत्सव व स्वेरीच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे निमित्त साधून ‘भारतीय संविधान’ या विषयावर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रा.सुभाष वारे हे प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करत होते.
दिपप्रज्वलनानंतर स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी सर्वांचे स्वागत करून पुढे म्हणाले की, ‘स्वेरी रौप्य महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण करत असताना विविध उपक्रम राबवित आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज या मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून रॉ मटेरियलचे फिनिश्ड मटेरियलमध्ये रूपांतर होत असताना, डिसिजन मेकर बनत असताना आपल्या कर्तव्याचा आणि जनरल नॉलेजचा एक भाग म्हणून आपल्या व्यक्तिमत्वाला सर्व बाजुंनी पैलू पाडण्यासाठी तंत्रज्ञानाच्या बाहेर जाऊन असे प्रबोधनपर मार्गदर्शन आपण घेत राहिलो तर ज्ञानात अजून भर पडते. यासाठी असे कार्यक्रम आवर्जून ऐकणे गरज आहे.’ प्रा. सुभाष वारे यांनी विद्यार्थ्यांना ‘अत:दीप भव’ हा संदेश दिला.
पुढे बोलताना प्रमुख पाहुणे प्रा. वारे म्हणाले की, ‘स्वातंत्र्य चळवळीच्या काळात गांधीजींच्या नेतृत्वाखाली जनतेला प्रचंड विश्वास मिळत होता. त्यातून भारताच्या राज्यघटनेची खरी ताकद समजली. पुढे १४ वर्षाच्या शिरीष कुमारची घटना घडली. शिरीष कुमार यांनी राष्ट्रसेवा करण्याचे कार्य केले. राज्यघटनेच्या अभ्यासातून निवडणुकांवर आधारित लोकशाही कसे कार्य करते ते समजते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्यावेळी घटना समितीचे अध्यक्ष होते. त्यांची तुलना कोणाबरोबरही करता येणे अशक्य आहे. त्यांना जगभरातील घटनांचा अभ्यास होता. डॉ.आंबेडकरांच्या प्रयत्नातून संविधान तथा राज्यघटनेची निर्मिती झाली.
आपल्या स्वातंत्र्य चळवळीला इतिहास आहे आणि हे स्वातंत्र्य आपल्याला प्रचंड परिश्रमातून मिळाले. आज दर पाच वर्षांनी कोणताही हिंसाचार न करता, रक्तपात न करता आपण ‘भारतीय संविधान मुळे’ मतपेटीद्वारे नेतृत्व बदलतो. ही अशी स्थिती १९५० च्या पूर्वी नव्हती. सर्वप्रथम सावित्रीबाईंचे आभार मानले पाहिजेत. त्यांनी जर हालअपेष्टा सहन केल्या नसत्या तर तुम्ही तर सोडाच पण मीही या ठिकाणी नसलो असतो. लढण्याची जिद्द व ज्ञान प्राप्त करण्याचे सामर्थ्य असेल तर आपण हवा तो व्यवसाय करू शकतो. ही स्थिती १९५० च्या पूर्वी नव्हती. धर्मशास्त्रानुसार, महिलांनी शिक्षण घेणे हे पाप आहे असा तत्कालीन समाजात गैरसमज होता. अशी परिस्थिती असताना हे कार्य करण्याचे धाडस सावित्रीबाईंनी केले आणि त्यांनी मुलींना शिक्षण दिले त्यामुळे पुढच्या अनेक पिढ्या घडल्या. भारतीय संविधानाच्या निर्मितीनंतर, म्हणजे १९५० नंतर सर्वांना मूलभूत अधिकार मिळाले ते केवळ संविधानामुळेच. बाळंतपणाची रजा ही संकल्पना कल्पना सर्वप्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी पुढे आणली.
त्यानंतर ‘हिंदू कोड बिल’ मंजूर होत नाही म्हणून डॉ. आंबेडकरांनी १९५१ साली मंत्रीपदाचा राजीनामा दिला. महिलांचे सर्वाधिकार मिळण्यासाठी ‘हिंदू कोड बिल’ होते. कामगार व त्यांच्या हक्कांसाठी हा कायदा होता. यासाठी संविधानाच्या व्यापकतेचा अभ्यास करणे गरजेचे आहे. भारतातील सर्व धर्मांच्या लोकांना विकासाची समान संधी देणारे भारतीय संविधान हे जगात श्रेष्ठ ठरले आहे. यासाठी आपण संविधान नीट समजून घेणे आवश्यक आहे. आज भारताची लोकसंख्या लोकसंख्या १३० कोटी असताना ‘शेतकरी व शेतमजूर’ यांच्या पाठीशी सरकार आहे ही समाधानाची बाब आहे. देशाचे भविष्य उज्ज्वल घडवायचे असे तर भारतीय संविधान अभ्यासावेच लागेल.’ असे सांगून प्रा.वारे यांनी संतांबरोबरच वास्को द गामा, महात्मा ज्योतिबा फुले, कोलंबस यांची उदाहरणे देखील दिली आणि पुढे युरोप, अमेरिका, युक्रेन या देशातील कायद्यांवर ही प्रकाश टाकला. शेवटी त्यांनी ‘विज्ञानाचा स्वीकार केल्याशिवाय विवेकाची प्रतिभा मिळत नाही. यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनातून शिक्षण घेणे आवश्यक आहे. भारतीय संविधानातून सर्वांना शिक्षण व सर्वांना सक्षम रोजगार मिळण्यासाठी कायदा लागू झाला.
छत्रपती शिवाजी महाराजांचे रयतेबाबतचे अर्धवट राहिलेले कार्य डॉ.आंबेडकरांच्या संविधानाने पूर्ण होऊ शकते. यासाठी संविधानाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. आज माणुसकी अंगीकारताना साने गुरुजींच्या ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अजून अर्पावे.’ या धर्तीवर कार्य केले पाहिजे. उंबरठ्याच्या आत मध्ये कोणत्याही धर्माने जगा परंतु उंबरठ्याबाहेर मात्र माणुसकीने जगले पाहिजे. एकूणच आपले भविष्य हे ‘भारतीय संविधान’ आहे हे मात्र नक्की.’
यावेळी मंगळवेढा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निशिकांत परचंडराव, दलित मित्र कदम गुरुजी शिक्षण संस्थेचे डॉ. सुभाष कदम, दैनिक पंढरी भूषणचे संपादक शिवाजी शिंदे, सौ. नंदा वारे, समाजसेविका आशाताई बागल, स्वेरीचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त धनंजय सालविठ्ठल, स्वेरीचे माजी अध्यक्ष व विश्वस्त नामदेव कागदे, संस्थेचे विश्वस्त एच.एम. बागल, स्वेरी अभियांत्रिकीचे अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी तसेच स्वेरीतील व लोटस इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थी उपस्थित होते. प्रा.यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.