दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचा समारोप
सोलापूर प्रतिनिधी
ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य जिल्हा ग्रंथालय अधिकारी सोलापूर यांच्या वतीने आयोजित सोलापूर ग्रंथोत्सव 2022 च्या दुसऱ्या दिवशी मान्यवरांच्या विचारसंवाद, कवीसंमेलनाने वाचक, श्रोत्यांना साहित्यिक मेजवानी मिळाली.
आम्ही संस्थानाचे राजे आहोत, तुम्ही तर ज्ञानाचे राजे आहात, असा गौरवपूर्ण उद्गार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल राजर्षि शाहु महाराज यांनी काढले होते. यातून त्यांनी ज्ञानाला, पुस्तकांना दिलेले महत्व अधोरेखित होते. त्यामुळे ते ज्ञानाचे राजे होते, असे मत प्रा. राजेंद्र दास यांनी व्यक्त केले.
ग्रंथोत्सव २०२२ अंतर्गत सकाळच्या सत्रात रयतेचे राजे छत्रपती राजर्षि शाहू महाराज या विषयावर त्यांनी विचार मांडले. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा. कृष्णा इंगोले यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव, सोलापूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे, ग्रंथालय निरीक्षक प्रमोद पाटील, प्रदीप गाडे कुंभार आदि उपस्थित होते.
यावेळी कृष्णा इंगोले म्हणाले, देशात ७०० संस्थाने होती. लोकांनी अन्य कोणत्या राजाला लक्षात ठेवले नाही. मात्र राजर्षि शाहू महाराज यांच्या कामामुळे त्यांना लोकांनी हृदयात ठेवले आहे. माणदेशनगरी ही साहित्यिकांची, भक्तांची, शूरवीरांची नगरी असल्याचे उल्लेख त्यांनी यावेळी केला.
दुसऱ्या सत्रात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक देवा जाधवर म्हणाले, एमपीएससीची परीक्षा पद्धत बदलली. त्यात आपल्या मुलांना केंद्रीय परीक्षा देता यावी म्हणून बदल केला गेला आहे. त्याला घाबरू नये.
जिल्हा परिषद मुख्य वित्त व लेखाधिकारी अजयसिंग पवार म्हणाले, ग्रंथपालाने वाचकाशी पुस्तकाचे नाते जोडावे. आपली निर्णय क्षमता वाढवावी. ती ज्याची वाढते त्याला अधिकारी होता येते. स्पर्धा कितीही असली तरी तुम्ही परिस्थितीवर मात करून विजयी व्हा, अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या. काशीनाथ भतगुणकीकर यांनी प्रस्तावना केली. यावेळी जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालयांचे ग्रंथपाल कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळच्या सत्रात रयतेचे राजे छत्रपती राजर्षि शाहू महाराज या विषयावर कुर्डुवाडीचे ज्येष्ठ कवी, व्याख्याते डॉ. राजेंद्र दास यांनी विचार मांडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माणदेशी साहित्यिक डॉ. कृष्णा इंगोले होते. त्यानंतर स्पर्धेच्या युगात झेपावणारी तरूणाई या विषयावर युनिक अकॅडमीचे देवा जाधवर यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखाधिकारी अजयसिंह पवार होते.
दुपारच्या सत्रात निमंत्रितांच्या कवी संमेलनाने सादर केलेल्या कवितांनी रसिकांचे मनोरंजन केले. या कवी संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी माधव पवार होते. इंद्रजीत घुले (मंगळवेढा), बदीउजम्मा बिराजदार (सोलापूर), डॉ. स्मिता पाटील (मोहोळ), मारूती कटकधोंड (सोलापूर), प्रकाश गव्हाणे (बार्शी), रेणुका बुधाराम (सोलापूर), महादेव कांबळे (सांगोले), गणेश गायकवाड (पंढरपूर) लक्ष्मण हेंबाडे (मंगळवेढा) यांनी कविता सादर केल्या.
समारोपीय कार्यक्रमात लोकाभिमुख ग्रंथालये काळाची गरज आणि ग्रंथालयांची भूमिका या विषयावर प्रा. डॉ. सुवर्णा गुंड (वडाळा) यांनी विचार व्यक्त केले. अध्यक्षस्थानी जिल्हा ग्रंथालय संघाचे माजी अध्यक्ष प्रा. हरिदास रणदिवे होते.