मुंबई प्रतिनिधी - गणेश हिरवे
अभिजित राणे युथ फाउंडेशनच्या वतीने संस्थेचे संस्थापक अभिजित राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धा, कविता स्पर्धा आणि वृत्तपत्र लेखन स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा मुंबईच्या नरिमन पॉईंट येथील यशवंतराव सभागृहात दिनांक २४ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी पार पडला.
अभिजित राणे युथ फाउंडेशन, वास्ट मीडिया, दै. मुंबई मित्र व दै. वृत्तमित्र यांच्या विद्यमाने आयोजित ह्या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी संस्थापक अभिजित राणे, दै मुंबई मित्रच्या संपादिका सौ अनघा राणे, माहिती अधिकार कार्यकर्ते श्री अनिल गलगली व इतर मान्यवर उपस्थित होते.
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत नवी मुंबईचे वृत्तपत्रलेखक श्री वैभव पाटील यांना 'देशाच्या विकासातील महिलांचे स्थान' या विषयावरील त्यांच्या निबंधासाठी दुसऱ्या क्रमांकाचे पारीतोषिक प्राप्त झाले. तर प्रथम क्रमांक सुजाता हनमघर, श्रद्धा वझे तृतीय, सुशील माळवी चतुर्थ, मनीषा कडव यांनी पंचम क्रमांक पटकावला. राज्यस्तरीय वृत्तपत्र लेखन स्पर्धेत जयराम देवजी प्रथम, मनमोहन रोगे द्वितीय, दीपक गुंडये तृतीय, मधुकर कुबल चतुर्थ, सुर्यकांत भोसले यांना पंचम तर राज्यस्तरीय कविता लेखन स्पर्धेत डॉ. शैलजा करोडे प्रथम, शुभांगी गुरव द्वितीय, संगीता उपाध्ये तृतीय, सोनाली शिंदे चतुर्थ, विलास देवळेकर यांनी पंचम क्रमांक पटकावली.
सर्व विजेत्या स्पर्धकांना या प्रसंगी सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन वीर लक्ष्मणराव अण्णाजी राणे समाजभूषण पुरस्कार प्रदान करून मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. यावेळी श्री गणेश दर्शन स्पर्धा तसेच समाजातील व कामगार चळवळीत योगदान देणाऱ्या अनेक मान्यवरांनादेखील गौरवण्यात आले.
अभिजित राणे यांनी याप्रसंगी आपल्या भाषणात बोलताना उपस्थित सर्व सन्मानार्थींचे कौतुक करत आपण सर्व एका कुटुंबातील घटक असून हा सोहळा म्हणजे एक कौटुंबिक कार्यक्रम असल्याचे मत व्यक्त केले. तसेच समाजातील दुर्लक्षित मात्र असामान्य कामगिरी करणाऱ्या संस्था, व्यक्तींचा गौरव करण्यात युथ फाउंडेशनच्या माध्यमातुन सातत्य राखले असल्याचेही स्पष्ट केले. सदर कार्यक्रमाप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर व दर्शकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.