हे लिखाण मला करावेसे वाटले याचे कारण पंढरपुराच्या गोरगरिबांची, सर्वसामान्यांची जीवन वाहिनी समजल्या जाणाऱ्या पंढरपूर अर्बन बँकेची निवडणूक आहे!
दि.पंढरपूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पंढरपूर या संस्थेची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. वास्तविक ही प्रक्रिया २०१९ मध्येच होणार होती परंतु कोविड सारख्या महाभयंकर रोगामुळे ती पुढे ढकलावी लागली आणि यावर्षी म्हणजे २०२२ मध्ये सुरू झाली. माननीय श्रीयुत सुधाकरपंत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय शिस्तबद्ध, काटेकोरपणे चालवली जाणारी ही संस्था त्यांचे वारसदार प्रशांत परिचारक हे अतिशय सक्षमपणे चालवीत आहेत, असे असताना काही नवीन आणि अनुभवी नसलेल्या लोकांकडून बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी म्हणजेच परिचारकांना आव्हान देण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याचा प्रयत्न करण्यात आला, असे असताना प्रशांत परिचारक यांनी श्रीमंत सुधाकर परिचारक यांचा वारसा चालवीत या आव्हानाला देखील सामोरे जाण्याचे ठरविले. विरोधकांनी निवडणूक प्रक्रियेतील उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधीच पत्रकार परिषद घेऊन परिचारक आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दूषणे देण्याचे काम केले, म्हणजेच आरोप करण्याचे काम केले पण परिचारक यांच्या गटाकडून त्यांना कोणतेही उत्तर देण्याचे टाळले.याउलट आज निवडणूक प्रक्रियेतील अर्ज छाननीचा भाग असताना त्यामध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विरोधकांचे सर्व अर्ज अवैध करीत बाद ठरविले, त्यामुळे निवडणूक प्रक्रियेतील कामाप्रमाणे निवडणूक बिनविरोध झाल्याचे उशिराने अधिकृतरित्या जाहीर केले जाईल. हे जरी असले तरी आज रोजी श्री. प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली पॅनेलने बिनविरोध ही निवडणूक जिंकलेली आहे आणि या निश्चित असलेल्या विजयाने भारावून न जाता परिचारक यांनी अतिशय संयमी आणि राजकीय परंपरा कायम ठेवत प्रतिक्रिया दिली, ती खूप बोलकी आहे.
त्यांनी सांगितले निवडणूक कोणतीही असो विरोध होतच असतो आणि हे लोकशाही जिवंत असण्याचे लक्षण आहे त्याप्रमाणे कोणीही राजकीय विरोधाला आपल्या डोक्यामध्ये बसू देऊ नये उलट हे सर्व खिलाडू वृत्तीने घेऊन चालले पाहिजे. असे आपले श्रीमंतांनी दिलेले राजकीय विचार आणि तो वारसा दाखवून दिला आहे. एकीकडे हे घडत असताना संस्थेतील कारभाराविषयी प्रशांत रावांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे असे वाटते, कारण विरोधकांनी जे काही आरोप केले आहेत ते सर्व खरेच व सत्य असतील असे नाही परंतु त्यातील काही गोष्टींमध्ये थोड्या फार प्रकारे सत्यता दिसत आहे,
म्हणजे बँकेची आर्थिक स्थिती म्हणजे सहकार खात्याच्या लेखापरीक्षण अहवालामध्ये संस्थेची कर्ज वसुली ही मोठ्या प्रमाणावर थकल्याचे दाखविले गेले आहे हे सुद्धा संस्थेच्या दृष्टीने धोकादायक आहे, असे अनेक आर्थिक जाणकारांनी आमच्याशी बोलताना सांगितलेले आहे. श्री. प्रशांत परिचारक यांनी इथून पुढील काळात या आर्थिक शिस्तीकडे लक्ष देण्याची गरज आहे. मी आधी लिहिल्याप्रमाणे स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांचा वारसा पुढे न्यायवयाचा असेल तर त्यांनी पूर्वी पंढरपूर अर्बन बँकेला घालून दिलेली आर्थिक शिस्त काही गोष्टींमध्ये तडजोड करून बँकेची आर्थिक स्थिती भक्कम करणे अत्यंत गरजेचे आहे. तरच खऱ्या अर्थाने तुम्ही पंढरपूरचा राजकीय वारसा आणि आर्थिक, सामाजिक वारसा चालवू शकाल. त्याकरिता प्रशांतराव तुमचा परखडपणा, स्पष्ट पणा हा थोडा आवरावा लागेल. काही वेळा राजकारणामध्ये ह्या गोष्टी आवश्यक असते परंतु संस्थांच्या कारभारामध्ये या गोष्टींना थोडेफार पाठीवरती टाकून संयमीपणा दाखवावा लागतो आणि तो तुम्ही दाखवावा असे वाटते. याबाबतीत प्रशांतराव यांचे बंधू श्री. उमेश परिचारक यांचे विचार आणि आचार ऐकणे तुमच्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये महत्त्वाचे ठरणार आहे, म्हणजेच परिचारक घरातील राजकीय विचारांचा वारसा जो प्रशांत आणि उमेश यांच्यामध्ये विभागला गेला आहे तो एकत्रित करण्याचे वेळ आलेली आहे, असे एकूणच पंढरपूर तालुका, सोलापूर जिल्हा नव्हे तर महाराष्ट्र राज्यामधील बदलती राजकीय परिस्थिती पाहता वाटू लागले आहे.
माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीने हे सांगणे तसे पाहिले तर फारच मूर्खपणाचे ठरेल, परंतु आमच्या अभंगराव घराण्याचे म्हणजेच माझे आजोबा स्वर्गीय श्री. गणपतराव तथा दादासाहेब अभंगराव यांचे आणि स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांचे संबंध पाहता मी हे धाडस करतो आहे, हे विचार लिहीत असताना माझ्या हातून तुम्हाला अनाहूत सल्ला दिला गेला असेल तरी किंवा यातून तुम्हाला वाईट वाटले असेल तर तुम्ही कधीही मला हक्काने सांगू शकता परंतु पंढरपूर शहरातील हा जो लाखमोलाचा राजकीय वारसा आहे तो जोपासा एवढाच शेवटी सल्ला देतो.
-उत्तम अभंगराव.