पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सरकारच्या जोखडातून मुक्त झालेच पाहिजे, पूजेचे मूलभूत अधिकार कोणीही नाकारू शकत नाही. आपल्या राज्य घटनेत तसे नमूद आहे. पंढरपूर येथील विकास आराखडा चुकीचा असून येथे कॉरिडॉर करण्याची गरज नाही. तिर्थक्षेत्र म्हणून विकास करायचा असेल तर विमानतळ, उत्तम रस्ते,रेल्वे, नदीची स्वच्छता, घाट निर्मिती आदी सोयी सुविधा द्याव्यात असे प्रतिपादन भा ज पा चे खासदार डॉ सुब्रमण्यम स्वामी यांनी शनिवार दि.24डिसेंबर रोजी येथील श्री संत तुकाराम भवन येथे केले. डॉ सुब्रमण्यम स्वामी यांची मार्गदर्शन व विचार विनिमय बैठक तुकाराम भवन येथे झाली.
यावेळी व्यासपीठावर ह भ प राणा महाराज वासकर, चैतन्य महाराज देहुकर, नामदास महाराज, वीर महाराज, विधीज्ञ धनंजय रानडे , पत्रकार श्री विरेंद्र सिंह उत्पात,तसेच हैदराबाद येथील नामांकित वकील डॉ सुब्रमण्यम स्वामी यांचे सहकारी उपस्थित होते.
डॉ सुब्रमण्यम स्वामी पुढे बोलताना म्हणाले एखाद्या संस्थान मध्ये आर्थिक गैरव्यवहार झाला तर सरकार यात हस्तक्षेप करू शकते, पण मूलभूत व पारंपरिक पूजा अर्चा करण्याचे अधिकार कोणतेही कोर्ट अथवा सरकार हिरावून घेऊ शकत नाही. मंदिरातील उत्पन्न केंद्र किंवा राज्य सरकारने घेऊ नये .ते मंदिरातच राहावे,मंदिरांचे सरकारीकरण करू नये, मी याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील करून उत्तराखंड तसेच दक्षिणेतील अनेक मंदिर सरकारी करणातून मुक्त केली आहेत,व आता पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देखील सरकारच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे त्यांनी सांगितले.
पंढरपूर शहराचा विकास कॉरिडॉर करून होणार नाही तर रस्ते,विमानतळ, रेल्वे, नदी स्वच्छता आदी मूलभूत सुविधा द्याव्यात, घर,दुकाने, प्राचीन मंदिरे पाडून विकास होणार नाही नाही, कॉरिडॉर बाबत कुणाला नोटीस बजावली तर मला संपर्क करा. योग्य पर्याय काढला जाईल असे डॉ सुब्रमण्यम स्वामी म्हणाले. यावेळी मंदिर परिसरात नागरिक व दुकानदार उपस्थित होते.