इतिहास घडविण्यासाठी ध्येयवेडे असावे लागते,
ध्येय वेडी माणसेच इतिहास घडवतात.
,' भारत भूमी ही नररत्नांची खाण आहे.या भारत भूमी मध्ये अनेक वीर पुत्रांच्या यशोगाथा, शौर्यगाथा जतन केले आहेत. असे तेजस्वी ,तपस्वी, साहसी वीर पुत्र या भूमीत जन्माला आले हे आपले सौभाग्य. अशा महान वीर पुत्रांच्या गाथा वाचण्याने ,ऐकण्याने . मनाला उभारी मिळते.
असे अजिंक्य शौर्य पुत्र चक्रवर्ती महाराजा यशवंतराव होळकर यांची तीन डिसेंबरला जयंती.
"" या अजिंक्य शौर्य पुत्रास विनम्र अभिवादन,
जागतिक इतिहासात मराठ्यांचा इतिहास अद्वितीय आहे. आणि मराठ्यांचा इतिहास पट ज्यांच्या शिवाय पूर्ण होत नाही तो इतिहास होळकर शाहीचा आहे. स्वबळावर, स्वकष्टाने, स्वप्रयत्नाने स्वतःचा स्वतंत्र जाज्वल्य इतिहास निर्माण करण्याची धमक आपल्याला होळकर शाही च्या इतिहासातून मिळते. छत्रपती शिवराय व मल्हारराव होळकर यांच्या कर्तृत्वाचा आदर्श घेऊन स्वबळावर स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करणारे चक्रवर्ती महाराजा यशवंतराव होळकर यांचे कार्य ही अभिमानास्पद आहे.
इतिहास कार ना. स .इनामदार यांनी भारताचा नेपोलियन म्हणून महाराजा यशवंतराव होळकर यांना संबोधले आहे. मुगल सम्राट शहा आलम द्वितीय यांनी महाराजाधिराज राजराजेश्वर अलिजा बहाद्दूर ही उपाधी दिली .असे यशवंतराव होळकर धगधगता ज्वलंत निखारा स्वातंत्र्यासाठी अहोरात्र तळपणारा तेजस्वी तारा होता.
'दुसर्यांच्या ओंजळीने पाणी न पिता स्वतःच्या स्वबळावर कर्तुत्व आणि नेतृत्व सिद्ध करणारे यशवंतराव होळकर काही वर्ष हायात राहिले असते तर भारताचा इतिहास व इंग्रजाचे राज्य याला वेगळे वळण निश्चितच मिळाले असते. स्वातंत्र्याची प्रेरणा स्वदेशात निर्माण करणारा महान सेनानी म्हणून त्यांची ओळख भारतीय इतिहासात आहे. पण महान सेनानी चा इतिहास जगासमोर प्रभावीपणे आला नाही . परकीय सत्तेचा नायनाट झाल्याशिवाय खरे स्वातंत्र्य उपभोगू शकत नाही अशी काळाची पावले ओळखणारा महान योद्धा म्हणून शेवटपर्यंत इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. अपयश, निराशा यांना आपल्या जीवनात स्थान न देता संकटावर स्वार होऊन दुर्दम्य आशावाद बाळगून युद्धाचा झंजावात झेलणारा व पेलणारा अफाट कर्तृत्वाचा व नेतृत्वाचा, युद्ध कौशल्याचा, सकारात्मक चैतन्याचा झंझावात म्हणजे यशवंतराव होळकर.
संपूर्ण आयुष्यभर स्वदेश रक्षणासाठी, स्वाभिमानासाठी, निद्रिस्त झालेल्या राजसत्तांना जागे करण्याचे कार्य त्यांनी केले. पराकोटीची व्यक्तिगत संकटे कोसळूनही मनाचे संतुलन आयुष्यात ढळू दिले नाही. रणमैदानात सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे महापराक्रमी योद्धा म्हणून इतिहासाला त्यांची दखल घ्यावीच लागेल. पराकोटीचा स्वाभिमान ,अभिमान, आत्मविश्वास बाळगून इंग्रजी सत्तेला धक्का देणारे असे यशवंतराव होळकर यांचे कार्य होते.
आजच्या तरुण पिढीने आयुष्यातील निराशा ,अपयश झटकून दिले पाहिजे. स्वबळावर स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करू शकतो हा यशवंतरावाच्या कार्याचा आदर्श आपण जीवनात घेतला पाहिजे. जिद्द ,प्रयत्नांची पराकाष्टा, आयुष्यात निर्माण होणारी वादळे याला तोंड देत दुर्दम्य आशावाद घेऊन स्वाभिमानाने ,अभिमानाने जगण्याचा मूलमंत्र त्यांच्याकडून घेता येईल. होळकर शाही च्या इतिहासात स्वतःचा अजिंक्य इतिहास निर्माण करणारे महाराजा यशवंतराव होळकर यांचे कार्य स्फूर्तीदायी आहे. एखाद्या अफाट नेतृत्वाला, कर्तुत्वाला, विचारधारेला आपण जाती वादात ,व्यक्तिगत हितसंबंधात, नकारात्मक विचारधारेत त्यांना अडकवून खरा इतिहास जगासमोर आणत नाही ही आपली शोकांतिका. पण हिऱ्याला कोठेही टाका तो चमकणार हे निर्विवादपणे यशवंतराव होळकर यांनी संपूर्ण हयातीत दाखवून दिले.
अशा रणधुरंदर ,अजिंक्य, स्वाभिमानी ,शौर्य पुत्रास आमचा कोटी कोटी प्रणाम.
' महानतेचा मानदंड तू,
प्रेरणेची अजोड गाथा
प्रणाम करण्या तव कार्याला,
लवतो अलगत आमचा माथा '
रक्तबंबाळ करीन ब्रिटिशांनो मी देश तुमचा.
या भारत भुमीचा तसुतसु वर हक्क फक्त आमुचा.
फंदफितुरी बंद करा आण या मैदानाला!
हा होळकर हो मेल्या आईच दुध नाही प्याला.
शाहिर अमर शेख.
महाराज यशवंतराव होळकर यांच्या यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
सविता दूधभाते