(भाग-९)
१९५४ साली जन्मलेल्या मंगलताई १९७१ साली लग्न होऊन सासरी आल्या व आपल्या संसारामध्ये *लेकरा-बाळात रमूनही* गेल्या. *माहेरचे संस्कार व समाजाबद्दल मनात असणारी संवेदनशीलता* त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. सामाजिक उपक्रमांमध्ये भाग घ्यावा, समाजाचे प्रबोधन करावे अशा गोष्टींसाठी त्या संसारातून वेळ काढू लागल्या. लेकरा-बाळांना वाढवत असतानाच त्यांनाही सामाजिक कार्यासाठी आपल्याबरोबर घेऊ लागल्या.
आपल्या मुलीला सोबत घेऊन मंगलताई *सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये प्रबोधनाचं काम करण्यासाठी फिरत असत.* वेगवेगळ्या विषयांवर गावातील लोकांचे या दोघी मायलेकी प्रबोधन करीत असत. सन *२००१ सालातील* घटना. एका गावामध्ये असाच प्रबोधनाचा कार्यक्रम पार पडला व त्या दोघी वस्तीतून फिरत असताना त्यांना एक भयानक चित्र पाहायला मिळालं. *दुर्गंधी पसरलेल्या गाईच्या गोठ्यात एक चार वर्षाची व एक सात वर्षांची अशा दोन मुली झोपलेल्या होत्या,* गोठ्यामध्ये या छोट्या मुली अशा काय झोपल्या आहेत? याची चौकशी केली असता त्या घरातील व्यक्तीने बाहेर येऊन सांगितले, की *या दोन मुली माझ्या पुतण्या असून माझा भाऊ एड्ससारख्या दूर्धर आजाराने मरण पावला व पाठोपाठ माझी भावजयदेखील याच आजाराने मरण पावली. या दोन्ही मुली माझ्या घरात मी ठेवू शकत नाही, कारण मला माझ्या घरातील व्यक्तींची काळजी वाटते. म्हणूनच या दोन मुलींना मी गोठ्यात ठेवले आहे.*
मंगलताई व त्यांच्या मुलीने परोपरीने त्या व्यक्तीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. एड्स झालेल्या *मुलांबरोबर अथवा व्यक्तीबरोबर आपण काळजी घेऊन राहिलो तर आपल्याला काहीही होत नाही, एडस् हा संसर्गजन्य आजार नाही, त्यामुळे या मुलींना तुम्ही आपल्या घरात घ्या व स्वतःची काळजी घेऊन सांभाळ करा.* परंतु तो व्यक्ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. थोड्याच वेळात तो हमरीतुमरीवर आला व मंगलताईंना म्हणाला, *एड्स झालेल्या मुलींना कुटुंबात ठेवले तर काही होत नाही असे तुमचे म्हणणे असेल तर मग तुम्हीच या दोन मुलींना तुमच्या घरी का घेऊन जात नाही?* मंगलताई अत्यंत संवेदनशील मनाच्या असल्यामुळे त्या व्यक्तीचे बोलणे *मंगलताईंच्या ह्रदयाला स्पर्श करून गेले* व त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता पटकन *त्या दोन मुलींना घरी घेऊन येण्याची तयारी दाखविली.* त्या दोन मुलींना घेऊन मंगलताई स्वतःच्या घरी आल्या. त्या दोन मुलींना अंघोळ घालताना मंगलताईंच्या असे लक्षात आले, की या दोन मुलींना गेल्या काही दिवसांपासून कोणीही अगदी *स्पर्शदेखील* केलेला नाही, त्यामुळे त्या मुली मंगलताईंच्या स्पर्शाने थोड्याशा *भेदरून, गांगरून व हुरळूनदेखील* गेल्या.
आजूबाजूच्या बालकाश्रमामध्ये चौकशी केली असता त्यांनी अशा मुली *सांभाळण्यास नकार दिला.* मंगलताईंच्या असे लक्षात आले, की *एड्सग्रस्त मात्यापित्याची मुले अथवा एड्सबाधित मुले यांना सांभाळण्याची कोणतीही सोय उपलब्ध नाही.* नाईलाजाने मंगलताईंनी त्या दोन्ही मुलींना *आपल्याच घरी* ठेवून सांभाळण्याचा निर्णय घेतला, या निर्णयाला घरातील सर्वांनी *आनंदाने संमती* दिली व मंगलताईंच्या या कार्याला सुरुवात झाली. जन्मदात्या आईनेच नाकारलेली मुले, एड्सग्रस्त मात्यापित्यांच्या निधनानंतर अनाथ झालेली मुले, काका-मामा यांनी दुर्लक्षित केलेली मुले या सर्वांना सांभाळण्याची जबाबदारी मंगलताईंनी आपल्या शिरावर घेतली.
विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी *पंढरपूर शहरालगत मंगलताईंनी पालवी नावाने प्रकल्प सुरू केला.* हा प्रकल्प सुरू होऊन त्या ठिकाणी इमारत उभी करेपर्यंत अशा मुलांचा मंगलताईंनी *स्वतःच्या घरीच सांभाळ* केला. अशा मुलांचा सांभाळ करणे ही अत्यंत अवघड गोष्ट *सहृदयाच्या मंगलताईंनी* लिलया पार पाडली. मंगलताईंनी २००१ मध्ये या कार्याला सुरुवात केली. आजपर्यंत *किमान २४०* अशा मुला-मुलींचा त्यांनी सांभाळ केला आहे. एड्सग्रस्त असणारी मुले जेव्हा पालवीमध्ये येतात तेव्हा मंगलताई पूर्ण क्षमतेने त्यांच्यावर *उपचार करतात, सेवा- सुश्रुषा करतात,* परंतु अल्प आयुष्य लाभल्यामुळे ही मुले जेव्हा *मरण* पावतात, तेव्हा त्यांच्यावर *अंत्यसंस्कार* करण्याचे कामही मंगलताई करतात. अशी शेकडो मुले त्यांनी आजपर्यंत सांभाळली आहेत. सध्या त्यांच्या पालवी या संस्थेत *१२५ मुले व मुली* आहेत, या सर्व मुलांच्या शिक्षणाची सोयदेखील त्यांनी केली आहे. अत्यंत *ममतेने व आत्मियतेने* मंगलताई व त्यांचा *संपूर्ण परिवार* या कार्यात *तन-मन-धनपूर्वक* सहभागी आहे. संवेदनशील स्वभाव असणाऱ्या मंगलताईंना पंढरपूर शहरातील *बेवारस निराधार असणाऱ्या वृद्धांचीदेखील* काळजी घ्यावी असे वाटल्यामुळे त्यांनी *बेघरांसाठी निवारा केंद्रही* सुरू केले आहे. यामध्ये सध्या *२० वृद्ध स्त्री - पुरुष* राहत आहेत.
अशा पद्धतीने गेली वीसपेक्षा अधिक वर्षे मंगलताई सातत्यपूर्ण काम करीत आहेत. *वय वर्षे ६८* असणाऱ्या मंगलताई(मो.क्र.9881533403) आजही अत्यंत उत्साहाने काम करीत आहेत व इतरांना देखील काम करण्याची *प्रेरणा* देत आहेत. अनेकदा अशी *दुःखी-कष्टी, निराधार माणसे* आपल्याही नजरेत येतात परंतु आपल्यापैकी किती जणांना *मंगलताईंप्रमाणे* काम करावे असे वाटते? परंतु ग्रामीण भागातील त्या दिवशीच्या प्रसंगाने मंगलताईंनी अशा *विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी सेवा प्रकल्प* उभारला, त्यांच्या कार्यामुळे आजतागायत अनेक मुलांना *हक्काचे व आधाराचे घर* प्राप्त झाले आहे. म्हणूनच *अनेक-अनेकांची आई* बनलेल्या मंगलताईंना पाहून म्हणावेसे वाटते, *खरोखरच मंगलताईंना जीवन कळले आहे.*
- डॉ.श्री.सचिन लादे,पंढरपूर