(भाग-६)
१९०८ सालच्या अखेरच्या महिन्यातील एक रविवार. इंग्लंडमधील भारत भवनच्या आतल्या बाजूच्या खोलीत इंग्लंडमध्ये *क्रांतिकार्य करणाऱ्या सावरकर व अन्य क्रांतिकारकांची* साप्ताहिक बैठक सुरू होती. बैठकीतील व्याख्याने सुरू असताना भारत भवनच्या बाहेर रस्त्याच्या बाजूला एका खोलीमधून *ग्रामोफोनच्या तबकडीतून गाण्याचा आवाज* येण्यास सुरुवात झाली. ग्रामोफोनवर निरनिराळी गाणी लावून *अल्लड पोरींचा घोळका जमवून एक तरूण नाच-गाणे* करत होता. या गोंधळामुळे भारतभवनच्या आतल्या खोलीतील बैठकीमध्ये *व्यत्यय* यायला सुरुवात झाली. व्याख्याने ऐकत असलेल्या सावरकरांना हे कळेना,की हा त्रास कोण देत आहे? ते बाहेर आले व पाहतात तर *अल्लड पोरींचा घोळका जमवून नाच-गाणे करणारा तरुण होता मदनलाल.* या तरुणाने यापूर्वी देखील अनेक वेळा *स्वा.सावरकर व त्यांच्या सहकार्यांची थट्टा* केलेली होती. सावरकर व्याख्यान देत असताना त्यांची देखील *टर* उडवलेली होती. मदनलालला पाहताच सावरकर त्याला उद्देशून म्हणाले,*भारताच्या स्वातंत्र्याचा विचार या परक्या देशात आम्ही प्राणपणाने करीत आहोत. देशाला स्वातंत्र्य मिळाले तरच आपल्या देशातील सर्वसामान्य जनता सुखी होऊ शकेल,अशा प्रसंगी हौतात्म्याच्या गोष्टी करण्यापेक्षा या पोरींचा घोळका जमवून गाण्यांच्या ललकाऱ्या देत बसला आहेस. अशा गोष्टी तू का करत आहेस? तुला बैठकीला येणे पटत नसेल तर येऊ नको पण निदान इतरांना त्रास होईल असे तरी काही करत जाऊ नको.* सावरकरांचे हे शब्द मदनलालजींना लागले.ते अत्यंत खजील झाले व त्यांच्या मनावर मोठा परिणाम झाला. *सावरकरांच्या विचारांनी ते प्रभावित* झाले व त्यांनी सावरकरांना भेटण्याचा निर्णय घेतला.
१८ फेब्रुवारी १८८३ रोजी पंजाबमधील एका क्षत्रिय व श्रीमंत घराण्यात *मदनलाल धिंग्रा* यांचा जन्म झाला.घरातील *श्रीमंती व घरातील व्यक्तींनी केलेले लाड* यामुळे अगदी बालपणापासूनच *अल्लड व थट्टेखोर स्वभावाचा* असणाऱ्या मदनलालला उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला जायचे होते,परंतु त्याचा *मनमौजी* स्वभाव लक्षात घेऊन वडिलांनी मदत करण्याचे नाकारल्यानंतर मदनलालजींनी इंग्लंडकडे जाणाऱ्या बोटीवर कामे करून पैसे मिळविले व या पैशातून ते *सन १९०६ मध्ये* इंग्लंडला पोहोचले. तेथे त्यांनी इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला.*ऐषोआरामी स्वभाव* असल्यामुळे मदनलालजींचे देशाच्या *स्वातंत्र्याच्या संग्रामाकडे लक्ष नव्हते की इंग्लंडमध्ये चाललेल्या क्रांतिकार्याकडे.* उलट या *क्रांतिकार्यामध्ये सहभागी असणाऱ्यांची थट्टा उडवणे,त्यांच्या व्याख्यानात व्यत्यय आणणे* अशी कामे मदनलालजी करत. परंतु वरील प्रसंगात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारांनी ते अत्यंत प्रभावीत झाले व त्यांनी सावरकरांची भेट घेऊन माफी मागून या क्रांतिकार्यात येण्याची इच्छा व्यक्त केली. सावरकरांनी मदनलालजींना आपल्या क्रांतिकार्यात सहभागी करून घेतले.
*अत्यंत धाडसी व बुद्धिमान* असणाऱ्या मदनलालजींवर अनेक कामे सोपविली जाऊ लागली.अत्यंत श्रीमंत घरात वाढलेल्या व ऐश्वर्यामध्ये राहिलेल्या मदनलालजींचा इंग्लंडमधील अनेक *इंग्रज अधिकाऱ्यांशी पार्टीच्या निमित्ताने* संबंध आलेलाच होता. या संबंधांचा फायदा घेऊन इंग्लंडमधील अनेक *अधिकाऱ्यांच्या गोपनीय गोष्टी मदनलालजी क्रांतिकारकांना पुरवी लागले,* त्यामुळे या क्रांतिकारकांचा मदनलालजींवर विश्वास निर्माण झाला.*आपल्या देशावर राज्य करणाऱ्या इंग्रजांच्या मायभूमीत जाऊन क्रांतिकार्य करणे सोपे नव्हते. इंग्रजांच्याच देशात इंग्रज अधिकाऱ्यांना धमकावणे अथवा मारणे ही गोष्ट तर खूप दूरची.* परंतु सावरकरांच्या विचारांनी प्रभावित झालेल्या मदनलालजींनी *जीवाची पर्वा न करता दृष्ट,जुलमी व भारतव्दैषी कर्झन वायली या अधिकाऱ्याचा एका पार्टीमध्ये जाऊन वध केला.* कर्झन वायलीसारख्या एका बलाढ्य इंग्रज अधिकाऱ्याला यमसदनी पाठविल्याबद्दल मदनलालजींना अटक करण्यात आली व त्यांच्यावर खटला दाखल होऊन *१७ ऑगस्ट १९०९ रोजी लंडन येथील पेन्टेनाव्हली कारागृहात मदनलालजींना वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी फाशी देण्यात आले.* निर्भयपणे व निधड्या छातीने मदनलालजी या प्रसंगाला सामोरे गेले व आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी बलिदान दिले. त्यांच्या हौतात्म्यातून प्रेरणा घेऊन इंग्लंडमधील क्रांतिकार्य पुढे सरकले व भारतातदेखील अनेक क्रांतिकारकांनी प्रेरणा घेऊन कामाला सुरुवात केली.
सावरकर इंग्लंडमध्ये असताना त्यांनी *अनेकांना देशाच्या स्वातंत्र्याच्या संग्रामात येण्याचे आवाहन केले तसेच क्रांतिकार्याची माहिती देखील दिली, परंतु यातील अनेकांना या क्रांतिकार्यात येण्याची इच्छा झाली नाही.* परंतु घडलेल्या प्रसंगातून बोध घेऊन मदनलालजींनी क्रांतिकारी कार्यात सहभागी होऊन देशाच्या स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करले, म्हणूनच म्हणावेसे वाटते *मदनलालजींना जीवन कळले होते.*
- डॉ.श्री.सचिन लादे,पंढरपूर