राज्य सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजार रुपये मदत जाहीर करावी, कॉंग्रेस अध्यक्ष प्रकाश वाले यांची मागणी
सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकरी खचून चालला आहे राज्यात शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. ऐन सणासुदीच्या दिवसात शेतकरी हवालदिल झाला आहे. म्हणून राज्य व केंद्र शासनाने ताबडतोब ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७५ हजार रुपये मदत द्यावी, शेत मजुरांसाठी विशेष अनुदान जाहीर करावे या व इतर मागण्यासाठी सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे मा. तहसिलदार, सोलापूर दत्तात्रय मोहोळे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी प्रदेश चिटणीस किसन मेकाले गुरुजी, नरसिंह आसादे, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, युवक कॉंग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे, ब्लॉक अध्यक्ष देविदास गायकवाड, उद्योग वाणिज्य सेल अध्यक्ष पशुपती माशाळ, तिरुपती परकीपंडला, महेश लोंढे, बसवराज म्हेत्रे, NK क्षीरसागर, रामसिंग आंबेवाले, सहदेव ईप्पलपल्ली, सायमन गट्टू, महेश काळे, सुनील सारंगी, सुभाष वाघमारे, महेंद्र शिंदे, श्रीनिवास रामगल, वसिष्ठ सोनकांबळे, प्राजक्ता घाटे, शकुर शेख यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना शहर अध्यक्ष प्रकाश वाले म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकारच्या व राज्यातील शिंदे फडणवीस सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आणि दुर्लक्षामुळे शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. शेतकरी जगला तर देश जगेल. परंतु अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील शेती व शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी प्रचंड हवाल दिल झालेला आहे. असे असताना सुद्धा महाराष्ट्रात ईडीच्या कृपेने सत्तेवर आलेल्या दळभद्री शिंदे फडणवीस सरकार साधे पंचनामे ही करायला तयार नाहीत. राज्यात आस्मानी बरोबर सुलतानी संकट उभे टाकले आहे असेच चित्र दिसत आहे.
शिंदे फडणवीस सरकार सत्तेच्या मस्तीत धुंद झाले आहेत. खरेतर शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची गरज आहे. मात्र राज्य व केंद्र सरकार केवळ टीव्हीवरच दिसत आहे. ऐन दिवाळीच्या काळात शेतकरी भयाण संकटात सापडलाय त्यावर हे डबल ढोलकी सरकार बोलायला तयार नाही या गंभीर बाबींकडे राज्यातील शिंदे फडणवीस सरकारचे लक्ष वेधण्यासाठी व सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे व नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी यासाठी सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही राज्य सरकार व केंद्र सरकारकडे महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७५ हजार रुपये आर्थिक मदत द्यावी. शेतमजुरांसाठी विशेष अनुदान जाहीर करावे अश्या मागण्या आज आम्ही राज्य व केंद्र सरकारकडे करत आहेत. ताबडतोब मदत जाहीर न केल्यास शेतकरी तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाहीत.
तसेच मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे जागतिक भूक निर्देशांकात भारताची घसरण झाली असून, जगात १२१ देशापैकी १०७ व्या क्रमांकावर आपला देश आहे. हे अतिशय खेदजनक आहे. भारताची ही प्रतिमा सुधारण्यासाठी शेतकरी हिताचे व्यापक धोरण केंद्र सरकारकडून आखण्यात यावेत अशीही मागणी आम्ही करत आहोत. या प्रश्नावर राज्य व केंद्र सरकारने ताबडतोड निर्णय घ्यावा अन्यथा कॉंग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रकाश वाले यांनी दिला.