(भाग-७)
मुरलीधर हा *श्रीमंत व जमीनदार कुटुंबात* जन्माला आलेला मुलगा. घरच्या श्रीमंत परिस्थितीमुळे बालपण *अत्यंत लाडात व मजेत* गेले. मुरलीधरला चित्रपट पाहण्याचा छंद होता.*निवांतपणे भटकावे, मनाला येईल ते करावे,चित्रपट पहावेत* यामध्येच मुरलीधरचा वेळ जात असे.जीवनाला तशी कोणतीही *दिशा* नव्हती.डॉक्टर व्हावे असे वाटत असतानाच वडिलांच्या आग्रहास्तव ते वकील बनले.
स्वातंत्र्याच्या आंदोलनाने वेग घेतल्यानंतर *महात्मा गांधींच्या विचारांनी प्रभावित* होऊन त्यांनी स्वातंत्र्याच्या आंदोलनात स्वतःला झोकून दिले.*१९४२ च्या चले जाव* आंदोलनामध्ये काम केले.तुरुंगवासही भोगला. तरीही जगण्याला एक दिशा येत नव्हती.काय करावे हे पक्के ठरत नव्हते,*विरक्तवृत्ती* निर्माण होत होती.महात्मा गांधींच्या विचारांनीच आपण काहीतरी करावे असे वाटत होते,परंतु दिशा सापडत नव्हती.
एके दिवशी महात्मा गांधींच्या आवाहनानुसार *स्वच्छता अभियानामध्ये* त्यांनी भाग घेतला.हातामध्ये झाडू व एक तरटे (कचरा भरण्यासाठी पोते) घेऊन ते स्वच्छतेच्या कामाला लागले.रस्त्याने स्वच्छता करत-करत पुढे जात असताना रस्त्याच्या कडेला एक *कुष्ठरोगी* जखमी अवस्थेत पडलेला त्यांना दिसला.त्याच्या हातापायांना जखमा झालेल्या होत्या.*विपन्न अवस्थेतील त्या कुष्ठरोग्याला पाहून मुरलीधर यांना किळस वाटली व त्यांनी आपल्या हातातील तरटे त्या कुष्ठरोग्याच्या अंगावर टाकले व ते घरी परत आले.* घरी परतल्यानंतर ते अस्वस्थ झाले.या अस्वस्थतेचे कारण त्यांच्या *पत्नी साधनाताईंनी* विचारताच ते म्हणाले, *मी महात्मा गांधींच्या विचारांचा पाईक आहे,स्वच्छता हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे,तरीपण आज मला एका कुष्ठरोग्याकडे पाहून किळस का वाटली?,त्याची सेवा करावी असे का वाटले नाही?,असे का घडले असावे?,मी त्याची सेवा-सुश्रुषा न करता असा का पळ काढला?,मी माझ्या कामापासून का परावृत्त झालो?* अशा विचारांनी ते अस्वस्थ होते.अखेर त्यांनी आपल्या पत्नीबरोबर चर्चा करून त्याचवेळी *निश्चय* केला, *मी आज माझ्या कामापासून पळ काढला याचे प्रायश्चित्त म्हणून आजपासून मी आयुष्यभर कुष्ठरोग्यांची सेवा करेन,तरच मी महात्मा गांधींचा सेवक म्हणवून घेईन.*
या निश्चयातूनच पुढे *१५ऑगस्ट१९४९ रोजी मुरलीधर म्हणजेच बाबा आमटे यांनी महारोगी सेवा समितीची स्थापना करून चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा या ठिकाणी आनंदवनाची* निर्मिती केली.कुष्ठरोग्यांची सेवा कशी करावी याचे त्यांनी *शास्त्रशुद्ध वैद्यकीय प्रशिक्षण* घेतले.आपल्या पत्नीलाही या कार्यामध्ये सामील करून घेतले.डॉ.बाबा आमटे यांनी आपल्या जीवनामध्ये हजारो कुष्ठरोग्यांची स्वतः सेवा-सुश्रुषा करून त्यांच्या जीवनात *आनंद फुलवण्याचे व त्यांना स्वावलंबी बनवण्याचे* कार्य केले.त्यांच्या *डॉ.प्रकाश व डॉ.विकास* या दोन सुपुत्रांनी देखील हेच कार्य पुढे नेले.बाबा आमटे व त्यांच्या परिवाराने आपल्या कार्यातून आदर्श निर्माण करून ठेवला आहे. *डॉ.बाबा आमटे यांनी जसा कुष्ठरोगी पाहिला तसे कुष्ठरोगी अथवा इतर आजारी लोक आपण अनेकदा पाहतो,* परंतु आपल्यापैकी किती लोकांच्या मनामध्ये अशा *विपन्न अवस्थेतील व्यक्तींची सेवा करण्याचा भाव मनात येतो?* परंतु असा भाव बाबांच्या मनात निर्माण झाला व त्यांनी या कार्यासाठी स्वतःला वाहून घेतले, म्हणूनच म्हणावेसे वाटते बाबांना जीवन कळले होते.
- डॉ.श्री.सचिन लादे, पंढरपूर