माझं गाव, माझी जबाबदारी ( भाग -3 ) व्यसन
स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षात ही ग्रामीण भागातील शैक्षणिक, सामाजिक,आर्थिक,आरोग्य इ. पायाभूत सुविधा मध्ये म्हणावा तितका विकास झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही.
याचे प्रमुख कारण म्हणजे ग्रामीण भागात म्हणावे तितके प्रगल्भ शैक्षणिक वातावरण निर्माण झालेले नाही.लोक अजून ही श्रद्धा व अंधश्रद्धेच्या भावनेत सहज गुंतवून ठेवता येतात.माझं गाव, माझी जबाबदारी स्वीकारून आपण शैक्षणिक व आरोग्याच्या दृष्टीने चांगले पावले उचलली तरच आपणाला ग्रामीण भागातील युवा वर्गाला व्यसनापासून दूर ठेवू शकू .ग्रामीण भागातील युवकांनी त्याचे होणारे फायदे व तोटे ही अभ्यासावे.
खरा पाहता मानवाला निसर्गाने भरभरून दिले आहे.तेही मोफत.मानवी शरीराची आपण किंमत ही करू शकत नाही.अशा लाखो ,करोडो रुपयांच्या संपत्तीची आपण वाट लावत चाललो आहे. ग्रामीण भागातील युवकांनी हे लक्षात ठेवावे.
माणूस व्यसनाच्या आहारी कधी जातो हे पहिले पाहणे गरजेचे आहे.एक तर भरपूर संपत्ती जवळ आली, म्हणजेच आपण स्वतः गडगंज झालो की किंवा आपली आर्थिक स्थिती अतिशय नाजूक होते तेव्हा.
खरं पाहता ग्रामीण भागात सत्ता आणि मस्तीचे पेवच फुटलेले दिसते. देशातील 80% पेक्षा जास्त ग्रामपंचायती पाहिल्या तर त्यात निवडणूक दिलेले 70 -75 % सदस्य व्यसनाधीन असलेले पाहवयास मिळतात.त्याच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारणात येणारी मंडळी ही व्यसनाधीन व्यक्तीचं म्हणूनच येतात. तेव्हा ग्रामीण भागाचा विकासअशक्य होतो.जसे 2020 चे स्वप्न पाहिले तसेच 2047 हे ही दिवास्वप्नच राहिलं.
खरं पाहता ग्रामीण भागात शिक्षणाचे प्रमाण कमी असल्यामुळे व्यसनाधीन लोकांची संख्या वाढत आहे. व्यसन म्हणजे तर काय एखादी गोष्ट गरजेपेक्षा जास्त आपली करण्याचा प्रयत्न करणे. व्यसनाचे प्रमुख कारण मनातील तीव्र जळफळाट.मी पणा हा सुद्धा व्यसनाला कारणीभूत आहे.आज सर्वात जास्त पैसा माझ्याकडे आहे. हे दाखवण्यासाठी खुप मोठी स्पर्धा सुरू झाली आहे.यातूनच ग्रामीण भाग व्यसनाच्या आहारी चालला आहे.
घरात शैक्षणिक वातावरण नसल्याने घरातील लोकच बेशिस्त व बेअक्कल राहू लागले आहेत.त्यामुळे प्रत्येकांला वाटू लागले आहे.जगण्यात राम नाही.
आज ग्रामीण भागाला दारू, गांजा ,अफू , चरस , आकडे ,पत्ते , जुगार,तंबाखू, गुटखा,मावा,बाया तसेच रात्री बेरात्री पैसा नाही म्हणून चोऱ्या माऱ्या करणे, रात्रीत भूमातेला पोखरून पोखरून विकणे. अशा अनेक व्यसनात युवा पिढी अडकताना दिसत आहे.
ग्रामीण भागातील युवा पिढी याकडे पाऊले का टाकत आहे.हे पाहणे नितांत गरजेचे आहे.भविष्यात शिकून नोकरी मिळेल की नाही ही मनात भिती व उद्योग उभा करावा तर भांडवल उभारणी कशी करायची याची काळजी.
ग्रामीण भागातील विद्यार्थी व्यसनाच्या आहारी कसे जातात पाहणे गरजेचे आहे. सध्या ग्रामीण भागातील 8,9,10,11,12 वीची कोवळ्या वयातील मुले सुद्धा व्यसनाधीन होऊ लागले आहेत.ही चिंतेची बाब आहे.
घरातील आई बाबांना वाटत माझ्या मुलांनी झटपट पैसे कमवावे.या लहान वयातील मुलांकडून पालक अपेक्षा करू लागले आहेत.मग ते मुलं अपेक्षा पूर्ण करण्याच्या ओझ्यामुळे व्यसनाच्या आहारी जाऊ लागले आहेत.
पालकांनी मुलांच्या संगती कोणाबरोबर आहे. हे पाहणे गरजेचे आहे.योग्य वेळी पालकांनी दरडावले पाहिले.शिक्षकांने दरडावने म्हणजे सध्या शिक्षकच गुन्हेगार होतो.हे विद्यार्थ्यांना माहीत झाल्यामुळे शिक्षक काही बोलत नाहीत. याचा फायदा घेऊन विद्यार्थी व्यसनाच्या आहारी चाललेत. हे खुप धोकादायक आहे.
*शिवाय सरकारी यंत्रणांच्या वरदहस्ताने अनेक दोन नंबरचे व्यवसाय सध्या तेजीत आहे. महिन्याचे हप्ते घरपोच मिळाले की बस झाले.सरकारी अधिकारी आता करोडोत खेळत आहेत.फुक्कटचा पैसा पोत्याने मिळतोय.यात अधिकारी वर्ग खुषीत आहेत.पण येणाऱ्या अनेक पिढ्या आपण बरबाद करतोय. याचं पाप या अधिकारी व राजकीय वरदहस्त असणाऱ्यांना इथेच फेडून जायचे आहे. हे लक्षात का बरे येत नसावे.* नाना पाटेकर यांच्या भाषेत एखादा नगरसेवक निवडून येताना. त्यांच्याकडे दमडी नसते. परंतु पाच वर्षांनी तो पैशाच्या बेडवरून लोळतो.याला कारणीभूत फक्त आणि फक्त निवडणूक... निवडणूक काळात 16 ,17 वर्षाच्या आता कुठे मिसरूड फुटणाऱ्या मुलांना कार्यकर्ते बनवले जातात.त्यानाच आमने-सामने केले जाते.त्यातच ही मुले फसतात. व्यसनाच्या आहारी जातात.कुटुंबाला व स्वतः ला उध्वस्त करून घेतात.
ज्या गावात शैक्षणिक वातावरण निर्माण होते.आरोग्याच्या दृष्टीने चांगले दिवस येतील तेव्हाच लोक व्यसनापासून दूर राहतील.यासाठी गावातील सुजाण, आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी भरारी घ्यायची असेल तर बायलबेडे, दारुडे,गंजाडी, माफिया लोकांना निवडणूक न देता गावच्या विकासासाठी ध्यास घेतलेल्या सामान्य घरातील किंवा असामान्य घरातील व्यक्तींना निवडणुकीत निवडून देणे गरजेचे आहे.नाहीतर हे बायलवेडे,दारूडे, गंजाडी , माफिया आपली स्वतःची हौस पूर्ण करून घेण्यासाठी गावाच्या विकासासाठी आलेल्या निधीचा 3 चे 13 करून गावाचा पिळ काढून त्यातील थेंब थेंब रक्त पित राहणार. हे सांगायला कोणा भविष्यवेत्याची गरज नाही.
गावकऱ्यांनी व्यसनापासून दूर असणाऱ्या युवकांना निवडणूकीत देणे काळाची गरज आहे.
नाही तर ढवळ्या शेजारी बांधला पोवळ्या वाण नाही पण गुण लागला असेच होत राहणार... बाकी काय मग खोकी, पेट्या या शिवाय बाकी काय उरणार....
आज घडीला ग्रामीण भागातील लोकांना दारूचे गुत्ते किती आहेत.कुठे आहेत हे विचारले तर दारू दुकानदारांच्या नावासहित सांगू शकतात.पण आपलं पोरगं शिकत असलेल्या शाळेचे नाव..त्या पोराला शिकवणाऱ्या मास्तरचं नाव,शिकवत असलेले विषय, पोरगं कोणत्या इयत्तेत शिकतंय, त्याची आवड काय हे विचारले तर निरूत्तर होतात.
पण आपल्या नेत्यांला कोणता ब्रॅंड आवडतो व कोणत्या वारी कोणता हे सुद्धा एका झटक्यात सांगून टाकतात. काय तो कॉन्फिडन्स.हीच खुप मोठी खेदाची बाब आहे.
आता डिजिटल लावून जुगलबंदी रंगवली जावू लागली हे सुद्धा एक व्यसनच आहे.छोट्या मोठ्या नेत्यांचे वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरे करणे. अशी भलीमोठी सोंग करण्यासाठी व स्वतः च्या प्रसिद्धीसाठी लाखो रुपयांचा चुराडा केला जातो.
तोच लाखोंचा चुराडा शिक्षण, ग्रंथालय, आरोग्य, तालीम, क्रीडांगण, व्यायाम शाळा यावर करताना हाताला लखवा मारला जातो का...?
तेव्हा शासकीय अनुदान मिळते का पाहिले जाते....हीच ग्रामीण भागाची शोकांतिका आहे. पण सोंग करण्यासाठी शासकीय अनुदानाची वाट न पाहता कार्यकर्ते स्वतः च्या खिष्याला कात्री लावतात.तीच कात्री गावच्या मुलांसाठी लावताना खिसे का चाचपडले जातात.गरीबांची मुले पुढे जाऊ नयेत.हा तर मनसुबा नसेल ना.अजून खुप काही.......
प्रा.आनंदा आलदर