पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
कृष्णा, भीमा व निरा नद्यांमधून वाहून जाणारे पाणी मतदारसंघातील तलाव, नाले ओढे भरून देण्यासाठी आ समाधान आवताडे यांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
अनेक शेतकऱ्यांनी चालू खरीप हंगामातील आपल्या पेरणीचे काम पूर्ण केले आहे. तुरळक काही भागांमध्ये पेरणी करण्याचे काम सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये कृष्णा नदी पूर्णपणे भरली असून या नदीतून वाहत जाणारे पाणी मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील संबंधित एकोणवीस गावांना दिले गेले तर या भागातील पेरणी झालेल्या पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सदर पाणीपुरवठा करत असताना मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण तालुक्यातील टेल भागातील शिरनांदगी तलाव, मारोळी तलाव, लवंगी तलाव, पडोळकरवाडी तलाव, यांचेसह सोड्डी-शिवणगी पासून हुन्नूर मानेवाडी दरम्यान असणारे सर्व तलाव व ओढे- नाले, पाझर तलाव भरून शेवटच्या गावांमधील सर्व ओढे, बंधारे तसेच इतर सर्व छोटे मोठे नाले भरून देण्याचेही आ आवताडे यांनी सुचित केले आहे.
तसेच उजनीतून येणाऱ्या पाण्यातून भीमा नदी पूर्णपणे भरली असून या कॅनॉल मधील पाणी सोडून मंगळवेढा तालुक्यातील नंदूर, बोराळे, कर्जाळ, कात्राळ, हुलजंती टेल भागासह या संपूर्ण मतदारसंघातील ओढे, नाले तसेच विविध पाझर तलाव तसेच पंढरपूर तालुक्यातील वाखरी, गादेगांव पर्यंत ओढे नाले साठवण तलाव, पाझर तलाव भरून घेण्याची ही आमदार आवताडे यांनी उजनी लाभक्षेत्र विभागाचे अधीक्षक अभियंता खांडेकर यांना सूचित करून लवकरात लवकर पाणी सोडण्याचे ही सांगितले आहे.
त्याचबरोबर एनआरबीसी म्हणजेच निरा-भाटघर अंतर्गत नीरा नदी पूर्णपणे पाण्याने भरली असून पाण्याचा पूर आल्याने एनआरबीसी तून रांझणी तलावापासून ते मतदार संघातील सर्व कासेगाव तलाव, कोर्टी तलाव, गादेगाव तलाव, बोहाळी तलाव, ७ नं फाटा या भागासह सर्व तालुक्यातील साठवण तलाव, पाझर तलाव छोटे-मोठे नाले व तिसंगी येथील साठवण तलाव भरून एनआरबीसी तून देण्याच्या सूचना त्यांनी अधीक्षक अभियंता फाळके यांना दिल्या आहेत.
सदर पाणी सोडण्याच्या अनुषंगाने आमदार समाधान आवताडे यांनी राज्याची जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे विनंती केली असता मंत्री महोदय यांनी संबंधित अधिकाऱ्यांना अशा सूचना देऊन पाणी सोडण्याचे निर्देश दिले आहेत. विविध पाणी योजना अंतर्गत पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ टेल मध्ये येत असून उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या गावातील व संपूर्ण मतदारसंघातील पाण्याची परिस्थिती अतिशय भीषण असते. त्या पार्श्वभूमीवर हे पाणी सोडले तर जमिनीची भूजल पातळी सुधारण्यासाठी मोठी मदत होणार असून त्याचा फायदा येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये होणार असल्याचेही आमदार समाधान आवताडे यांनी यावेळी सांगितले आहे.