ईगतपुरी त्रंयबकेश्वर विधानसभा मतदारसंघ निकाल
चौरंगी कसली ही निवडणुक ठरली एकतर्फी
महायुतीच्या झंझावातापुढे सर्वच ठरले पाला पाचोळा
ईगतपुरी तालुका प्रतिनिधी - नवनाथ गायकर
महायुतीच्या सर्वच घटकासाठी असलेल्या विविध कल्याणकारी योजना, लोकसभा निवडणूक निकालाने खडबडुन जागा झालेला हिंदुत्ववादी मतदार, लाडक्या बहिणीनीं परतफेडीसाठीचा अभुतपुर्व प्रतिसाद आदिसह विविध सकारात्मक बाबी पथ्यावर पडत संपुर्ण महाराष्ट्र भर महायुतीचा अभुतपुर्व झंझावात पहायला मिळाला.ईगतपुरी त्रंयबकेश्वर विधानसभा मतदारसंघात ही या झंझावाताने विरोधकाचीं दाणादाण उडवली तर प्रथमच एवढया अभुतपुर्व फरकाने महायुतीचे उमेदवार हिरामण खोसकर हे विक्रमी मतानीं निवडुन आले आहेत.
प्रारंभी चौरंगी वाटणारी ही लढत अक्षरश: एकतर्फी झाली. जणु पहिल्या नंबरवर महायुती ठरलीय.फक्त दुसर्या नंबरवर कोण यासाठीच उर्वरीत उमेदवाराचीं आपसात स्पर्धा राहिली.
महायुतीचे हिरामन खोसकर हे सलग दुसर्यांदा आमदार झाले आहेत.यापुर्वी माजी आमदार सौ निर्मला गावित यांनी सलग दोनदा निवडुन येण्याचा पराक्रम केला होता.त्यानंतर आता हा भीम पराक्रम आमदार हिरामन खोसकर यांनी केला आहे.याच बरोबर कॉग्रेस पक्षाचा सलग पंधरा वर्षापासुन अभेदय असणारा हा बालेकिल्लाही त्यांनी उध्वस्त केला आहे.सतत मोदी व भाजप शिवसेना विरोधी कौल देणार्या या मतदारसंघाने प्रथमच मोदी व भाजप शिवसेनेच्या महायुतीच्या पारडयात आपली मते भरभरुन टाकली आहे.
महायुतीचे हिरामन खोसकर यांनी तब्बल सव्वा लाखाच्या आसपास मते मिळवली.तर प्रतिस्पर्धी कॉग्रेस, मनसे सह अपक्ष उमेदवारानां कॉग्रेस वगळता पंचवीस हजाराचाही पल्ला गाठता आला नाही.विशेष म्हंणजे सर्व विरोधकानां मिळालेल्या एकुण मतापेक्षाही जास्त मते खोसकर यांनी मिळवत एकतर्फी लढत जिंकली.
कॉग्रेस पक्षाचे लकी जाधव यांचे प्रचारासाठी कॉग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सभा घेऊनही त्यांना प्रचंड दारुण पराभव स्वीकारावा लागला.कॉग्रेस पक्षाचे पराभवासाठी कॉग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेत्यांनीच हातभार लावल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या असुन विदयमान आमदार हिरामन खोसकर यांना गद्दार ठरवत कॉग्रेस पक्षातुन हाकलण्याची मोठी गंभीर चुक प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केली तर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अपरिचीत व मतदारसंघाबाहेरील उमेदवार कॉग्रेस वर लादुन पक्षाचा पराभव प्रारंभालाच निश्चित केला होता. माजी आमदार सौ.निर्मला गावित यांना उमेदवारी नाकारण्याची घोडचुक म.वि.आ. ने केली.परिणामी पक्षाचा येथुन सुपडासाफ झाला.
अपक्ष उमेदवार सौ.निर्मला गावित व मनसेचे काशिनाथ मेंगाळ यांनी येथे एकाकी लढत दिली असली तरी फारसे अनुकुल वातावरण तयार करण्यात ते कमी पडले. सौ.निर्मला गावित यांनी कॉग्रेस पक्ष सोडुन मोठी चुक केली तर तीच चुक काशिनाथ मेंगाळ यांनी शिवसेना सोडुन यापुर्वी केली होती.पक्ष, विचार, तत्व व नेते यांचे पेक्षा स्वत:ला मोठे समजण्याची व मतदार आपल्यामागे फरफटत येतील असे ग्राहय धरण्याची चुक या उभय माजी आमदारानां भोवली आहे.
दरम्यान या निकालाने ईगतपुरी त्रंयबकेश्वर मध्ये कॉंग्रेस, उबाठा शिवसेना व शिंदे शिवसेनेचे अस्तित्व संपुष्टात आले असुन आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचाच वरचष्मा या दोन्ही तालुक्यामध्ये राहणार आहे.