सोलापूर प्रतिनिधी
संत महात्म्यांनी व शाहिरांनी समाज प्रबोधनातूनच समाज संस्कारित केले.महात्मा बसवेश्वर आणि सिद्धेश्वर महाराजांनी वचनातून समाजप्रबोधन केले तर संत ज्ञानेश्वरांनी अभंगातून ज्ञान दान केले.त्यांचे समाज सुधारणा हेच प्रमुख उद्दिष्ट होते.या महात्म्यांनी ज्ञानातून समाजाचा उद्धार केला.गरीबातील गरीब लोकांना ज्ञान दिले.त्यांना समाजाबद्दल अंतःकरणातून कळवळा होता यामुळेच समाज परिवर्तन घडवून आणले असे प्रतिपादन कवी नारायण सुमंत यांनी केले.
श्री बृहन्मठ होटगी मठाचे परमपूज्य गुरुवर्य लिं. श्री ष.ब्र. तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या सहाव्या पुण्यस्मरणानिमित्त नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस कन्नड भाषा व कन्नड संस्कृती संवर्धक कुंभार समाज शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने आयोजित 'तपोरत्नं बौद्धिक व्याख्यानमाले'प्रसंगी पहिले पुष्प गुंफताना सुमंत बोलत होते.'वारी ते बारी' हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता.
सुमंत पुढे म्हणाले,वारीत कोणाचेही निमंत्रण नसताना भक्त ठरलेल्या वेळेत देवासाठी येतात.बारीचे महत्त्व सांगताना शाहिरांनी पोवाड्यातून समाजसुधारण्यासाठी प्रबोधन केले .शाहिर हे लावण्या व पोवाड्यातून कटु सत्य मांडतात.यातूनच समाजप्रबोधन कार्य घडत असते.शिक्षण हे अर्थार्जनासाठी नसून ते विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकास होण्यासाठी उभारली आहे हीच खरी समाज सुधारणा असल्याचे सांगताना सुमंत म्हणाले, अर्थार्जन हा ज्ञानसंपदेचा उद्देश असूच शकत नाही.
सुमंत पुढे म्हणाले, ज्ञानाचा प्रवाह शिक्षणातून, योगींच्या अभ्यासातून आलेला असतो. राष्ट्रपुरुष, योगी, संतांची दशाक्षरी वचने हे अष्टांग मार्ग सांगतात. अध्यात्म फक्त भारतात आहे, येथेच गुरु महात्म्य कळते,आपण नोकरी करुन गुलाम न बनता गुलामी पत्करुन नये कारण गुलामांना स्वतःचा धर्म नसतो, आपण गुलाम बनण्यापेक्षा मालक बनण्याचे आवाहन केले.
तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजीनी शैक्षणिक संस्था उभारुन समाजप्रबोधनाचा वसा पुढे चालू ठेवल्याचे सांगितले.
याप्रसंगी कवी सुमंत यांनी आपल्या शैलीत विविध कविता, लावण्या, पोवाडे सादर करुन श्रोत्यांची मने जिंकली.याप्रसंगी श्रोत्यांमधून हास्याचे फवारे उडत होते.