(भाग-२)
भारतावर इंग्रजांनी आपली पकड मजबूत करायला सुरुवात केली. एकामागून एक संस्थाने खालसा केली. जवळजवळ संपूर्ण भारतावर त्यांनी आपले राज्य प्रस्थापित केले. महाराष्ट्रातील अनेक संस्थाने - अनेक किल्ले त्यांनी ताब्यात घेतले व *संस्थानिकांचे हक्क व वतनदाऱ्याही संपविल्या.* किल्ल्यांच्या संरक्षणाचे काम असणाऱ्या *रामोशी बेरड समाजाचेही हक्क हिरावून घेतले.* अनेक किल्ल्यांवरच्या वतनदारांचे हक्क हिरावून घेतल्यानंतर त्यांनी *इंग्रजांना अर्ज - विनंती* करून न्याय मागण्याचा प्रयत्न केला, परंतु *आपल्याच हक्कासाठी अर्ज - विनंती करण्याऐवजी आपण लढा दिला पाहिजे* हा विचार करून इंग्रजांविरुद्ध पहिली लढाई करणारा *आद्य क्रांतीकारक म्हणजेच उमाजी नाईक होय.*
*७ सप्टेंबर १७९१ रोजी पुरंदर किल्ल्यावर* लक्ष्मीबाई व दादोजी खोमणे-नाईक यांच्या पोटी जन्माला आलेल्या उमाजीला त्यांच्या वडिलांनी दांडपट्टा, तलवार, भाला, कुऱ्हाड, तीरकामठा, गोफणी चालवण्याचे प्रशिक्षण दिले होते तर रामोशी बेरड समाजाकडे असणारी हेरगिरीची कलाही त्याने अवगत केली होती. व्यायामाने शरीर पिळदार बनले होते तर मन अत्यंत कणखर बनलेले होते, त्यामुळेच इंग्रजांना अर्ज - विनंती करून आपले हक्क मागण्याऐवजी इंग्रजांविरुद्ध लढायचे हा त्यांनी आपल्या सवंगड्यांसह *संकल्प केला.* शिवरायांप्रमाणेच त्यांनी देखील *जेजुरीच्या खंडोबारायासमोर स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा* केली.
*आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य हवेच कशाला?* असे म्हणून आपल्या सहकाऱ्यांना इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी प्रवृत्त केले. इंग्रजांविरुद्धच्या चळवळीमुळे उमाजींना *सन१८१८ साली कैद करण्यात आली* व एक वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. या एक वर्षांमध्ये त्यांनी *लेखन व वाचन शिकून घेतले* व आपल्या समाजासाठी काम करण्यास्तव या साक्षरतेचा उपयोग करण्याचे ठरवले. एक वर्षाच्या शिक्षेनंतर उमाजी यांनी इंग्रजांविरुद्धचा लढा आणखी प्रखर केला. इंग्रजांविरुद्ध लढायचे तर *सशस्त्र सैन्य* उभे करावे लागणार व यासाठी पैशाची आवश्यकता आहे हे ओळखून उमाजीने आपल्या सहकाऱ्यांसोबत *इंग्रजांचा खजिना लुटण्यास* सुरुवात केली. अनेक ठिकाणचे त्यांनी खजिने लुटले व या पैशातून सैन्य उभा केले व गोरगरिबांनाही मदत केली. या कामाच्या आड येणाऱ्या अनेक *इंग्रज अधिकाऱ्यांना त्यांनी यमसदनाला पाठविले,* त्यामुळे इंग्रज अधिकारी संतापले. परंतु उमाजीविरुद्ध ते काही करू शकत नव्हते, कारण उमाजींचे नेतृत्व सर्वसामान्यांनी मान्य केले होते.
उमाजीने उभारलेल्या सैन्यातील प्रत्येक तुकडीत *पाच हजार सैन्य* होते. सशस्त्र सैन्याच्या बळावर समाजाचे रक्षण करणाऱ्या उमाजीकडे लोक राजे म्हणून पाहू लागले. *२२ जुलै १८२६ रोजी कडेपठार, जेजुरी या ठिकाणी उमाजींचा राज्याभिषेक* करण्यात आला. इंग्रजांविरुद्ध लढाई करणारा व आपल्या स्वराज्याची स्थापना करणारा उमाजी हा *पहिला राजा बनला.* उमाजीने भारतातील सर्व खालसा झालेल्या संस्थानिकांना पत्रे पाठवून *भारताच्या स्वातंत्र्यासाठी ठिकठिकाणी उठाव करण्याचे आवाहन केले.* कदाचित उमाजीच्या या आवाहनाला प्रतिसाद देऊन त्या काळात उठाव झाले असते तर *भारताला शंभर-सव्वाशे वर्षे आधीच स्वातंत्र्य मिळाले असते.*
उमाजीने इंग्रजांना सळो की पळो करुन सोडले त्यामुळे इंग्रज पुरते घाबरून गेले व त्यांनी उमाजींना पकडून देणाऱ्यास *दहा हजार रुपये रोख व २०० एकर जमीन बक्षीस* देण्याचे त्या काळात जाहीर केले. एवढी प्रचंड रक्कम बक्षीस म्हणून देण्यामागे इंग्रज उमाजींना किती घाबरले होते हेच सिद्ध होते. उमाजींच्या मागे सामान्य जनता उभी होती, त्यामुळे अनेक वर्षे उमाजींना इंग्रज पकडून शकले नाहीत. परंतु दुर्दैवाने *१५ डिसेंबर १८३१ रोजी* बेसावध अवस्थेत भोर तालुक्यातील उतरोली येथे उमाजींना इंग्रजांनी पकडले. *३५ दिवस* काळ्या कोठडीत ठेवून त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले व अखेरीस इंग्रज न्यायाधीशांनी त्यांना *फाशीची शिक्षा सुनावली.*
*३ फेब्रुवारी १८३२ रोजी पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत* त्यांना फाशी देण्यात आली. उमाजींना फाशी दिली गेल्यानंतर *त्यांचे प्रेत मामलेदार कचेरीच्या बाहेर असणाऱ्या पिंपळाच्या झाडाला तीन दिवस लटकावून ठेवण्यात आले होते.* यातून सर्वसामान्यांमध्ये इंग्रजांविरुद्ध दहशत बसावी हाच त्यांचा हेतू होता. देशाच्या स्वातंत्र्यासाठी *पहिला संघर्ष उभा करणारे आद्य क्रांतिकारक* म्हणूनच उमाजींना ओळखले पाहिजे. उमाजींना पकडण्यासाठी अविरत प्रयत्न करणाऱ्या *कॅप्टन वॉकिंग टॉस* यांनीच लिहून ठेवले आहे, की *छत्रपती शिवरायांना आदर्श मानणाऱ्या उमाजींना फाशी दिले गेले नसते तर या भारतात दुसरा शिवाजी जन्माला आला असता.* असं अतुलनीय कार्य करणाऱ्या उमाजी यांच्याकडून प्रेरणा घेऊन पुढच्या काळात *वासुदेव बळवंत फडके* यांनी क्रांतिकार्याला सुरुवात केली. *आद्य क्रांतिकारक* अशी जरी बिरुदावली उमाजी यांच्यापुढे लागत नसली तरी भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या सर्वांना प्रेरणा देण्याचे काम उमाजींनी केले आहे.
भारतातील संस्थाने-वतनदाऱ्या संपुष्टात येत असताना अनेकांनी *इंग्रजांविरुद्ध लढायचे सोडून अर्ज - विनंती करून आपली वतने व जहागिऱ्या परत मागण्याचा प्रयत्न केला,* परंतु याच *प्रसंगातून-अपमानातून* उमाजींनी भारतीय स्वातंत्र्याच्या संघर्षाला सुरुवात केली म्हणूनच म्हणावेसे वाटते *उमाजींना खऱ्या अर्थाने जीवन कळले होते.*
-डॉ.श्री.सचिन लादे, पंढरपूर.